संसार थाटण्याआधीच संदीप झाला हुतात्मा

घरची परिस्थिती सामान्यच असताना सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या जवान संदीप ठोक यांचे संसाराचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले.
 
उत्तर काश्‍मीरमधील उरी शहरात रविवारी सकाळी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांसह घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी एका बटालियन मुख्यालयावर हल्ला केला. यामध्ये 17 जवान हुतात्मा झाले आणि अन्य 19 जण जखमी झाले. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांमध्ये संदीप सोमनाथ ठोक (वय 24) यांचाही समावेश आहे.
 
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील खडांगळी गावात संदीपचे कुटुंब शेतात राहते. घरची सामान्य परिस्थिती असलेले संदीपचे वडील टेलरिंगचे काम करून शेती करतात, तर त्याचा मोठा भाऊही शेती करतो. संदीप हे सिन्नरमधील पाचवे हुतात्मा जवान आहेत. संदीप यांचे लग्न दिवाळीनंतर होणार होते. दोन महिन्यांपूर्वी ते आपल्या गावी आले होते. त्यानंतर ते पाच जुलैला पुन्हा कामावर रुजू झाले होते. या वेळी त्यांच्या लग्नाचे बोलणे झाले होते आणि त्यांचा विवाह दिवाळीनंतर करण्याचे ठरले होते. पण, आज त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. सैन्यदलात स्वयंपाकी म्हणून काम करत असलेल्या संदीप यांची सैन्यदलात जाण्याची लहानपणापासून इच्छा होती. 2012 मध्ये ते सैन्यदलात भरती झाले होते. यापूर्वी ते बिहार रेजिमेंटमध्ये होते. त्यानंतर त्याची बदली 22 मराठा बटालियनमध्ये झाली होती. डेहराडूनहून नुकतीच त्यांची उरी येथील लष्करी तळावर बदली झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *