मुंबईत रात्र बाजार आणि हॉटेलच्या गच्चीवरील जेवणावळ आता चांगलीच रंगणार आहे. भाजपाची रात्र बाजाराची मागणी आणि शिवसेनेची हॉटेलच्या गच्चीवरील जेवणावळ हे बहुचर्चित तसेच वादग्रस्त प्रस्ताव पुन्हा एकदा महापालिका सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे बहुमताने नामंजूर केलेला हॉटेलच्या गच्चीवरील अन्नखाद्यसेवा पुरवण्याचा प्रस्ताव शिवसेना सभागृहात कसा मंजूर करते आणि भाजपाच्या रात्र बाजारावर शिवसेना काय भूमिका मांडते याकडे सर्वाचे लक्ष राहणार आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच मुंबईकरांच्या सोयीसाठी मुंबईतील १६ प्रभाग समितीच्या हद्दींमधील फेरीवाला क्षेत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून प्रत्येक शनिवारी दुपारी दोन ते रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत महापालिकेने योग्य ते शुल्क आकारून रात्र बाजारपेठ अर्थात ‘नाईट मार्केट’ सुरू करण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक आमदार अमित साटम यांनी केली होती.
यावर महापालिका आयुक्तांनी ८ मे २०१५मध्ये अभिप्राय देत फेरीवाला क्षेत्र निर्माण करतेवेळी शहर फेरीवाला समितीमध्ये नाईट मार्केट सुरू करण्याबाबतचे धोरण ठरविण्यात येईल, असे म्हटले होते. परंतु नाईट लाईफ ही संकल्पना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची असल्यामुळे भाजपाचा ठराव दप्तरी गेला होता.
त्यानंतर हा प्रस्ताव सभागृहापुढे आला असता यावरून वाद नको म्हणून तो तहकूब ठेवण्यात आला होता. फेरीवाला धोरणाबाबत राज्य सरकारकडून अध्यादेश निघाल्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा एकदा पटलावर घेण्यात आला आहे.
हॉटेलसाठीच वापर होत असलेल्या आणि अधिकृत वापरण्याजोगा चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) इमारतीच्या गच्चीवरील मोकळ्या जागेत अन्नखाद्य सेवा पुरवण्याचे धोरण महापालिकेने बनवले.
आदित्य ठाकरे यांच्या शिफारशीनुसार बनवलेल्या धोरणाचा प्रस्ताव भाजपाने विरोधकांसह खेळी खेळत सुधार समितीत नामंजूर करून शिवसेनेचा गेम केला होता. डिसेंबर २०१४ रोजी हा प्रस्ताव सुधार समितीत नामंजूर केल्यानंतर महापालिका सभागृहाच्या कामकाजात घेण्यात आला होता.
परंतु सपा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाचा पाठिंबा मिळणार नसल्यामुळे महापौरांनी प्रस्ताव तहकूब केला होता. दीड वर्ष लपवून ठेवल्यावर शिवसेनेने हा प्रस्ताव पुन्हा पटलावर आणला आहे.
भाजपाला सोबत घेऊन शिवसेनेला हा प्रस्ताव मंजूर करायचा आहे. शिवसेनेने चर्चा केली तर यावर भाजपा सकारात्मक राहील, असे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी स्पष्ट केले आहे.