खान्देशसाठी भाजपाने काय केले?

गेले दोन वर्षे महाराष्ट्रात भाजपा-सेनेचे राज्य आहे. या सरकारने दोन वर्षात खान्देशसाठी केले काय? खान्देशचे सगळे खासदार आणि बहुसंख्य आमदार भाजपा-सेनेचे असताना खान्देशच्या जनतेचा विकास झाला का? असा टोकदार सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथील प्रचंड सभेत विचारला.

दोंडाईच्याचे राष्ट्रवादीचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग करून काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या स्वागतासाठी झालेला शेतकरी मेळावा आणि पक्षप्रवेश सभेत नारायण राणे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे होते. शिरपूरचे काँग्रेस आमदार अमरिश पटेल यांच्या पुढाकाराने झालेल्या या सभेत माजी राज्यमंत्री हेमंत देशमुख यांचे काँग्रेसचा दुपट्टा घालून जोरदार स्वागत करण्यात आले.

या प्रचंड सभेत जोरदार आवाज देताना नारायण राणे म्हणाले की, तुमच्या भागातील जयप्रकाश रावळ याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. विधानसभेत भ्रष्टाचारी मंत्र्यांची जी नावे आली त्यात तुमच्या भागातील मंत्र्यांचे नाव आहे. त्याबाबत पुरावे दिले असताना या सरकारने काय कारवाई केली? गेल्या दोन वर्षात मोदींच्या सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने जी आश्वासने दिली होती त्या आश्वासनांचे काय झाले? असा सवाल विचारून नारायण राणे गरजले की, महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते की नाही? झाली का कमी महागाई? ‘अच्छे दिन’ आले का? असा सवाल विचारून ते म्हणाले की, ‘अच्छे दिन’ फक्त मोदी, फडणवीस यांनाच आलेले आहेत. सामान्य माणसांचे कोणतेही प्रश्न या सरकारने सोडवले नाहीत आणि जीवनमान उंचावण्यासाठी भाजपाने काही प्रयत्न केलेला नाही. राणे यांनी माजी मंत्री हेमंत देशमुख यांचे स्वागत करून ते काँग्रेसमध्ये आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. संपूर्ण खान्देशचा विकास काँग्रेसच करू शकते, असेही नारायण राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *