महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेवर रिक्षातच प्रसूतीची वेळ आली. दुर्दैवाची बाब म्हणजे जन्मल्यानंतर काही वेळातच हे बाळ दगावल्याने या रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा उजेड पडला असून, या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. संबंधित दोषींवर तातडीने कारवाईची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की सारसनगर परिसरातील प्रीती महेंद्र जोशी या महिलेची सोमवारी प्रसूती होती. त्यांच्यावर पहिल्यापासूनच मनपाच्या या दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ही महिला सोमवारी दुपारी प्रसूतीसाठी येथे दाखल झाली असता येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिला सोनोग्राफीसाठी अन्यत्र पाठवले, कारण या रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र नादुरुस्त असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
अडचणीची वेळ असल्याने नातेवाइकांनी या महिलेला सोनोग्राफीसाठी बाहेर नेले. मात्र गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने सोनोग्राफी न करताच या महिलेला परत देशपांडे रुग्णालयात आणताना रिक्षात या महिलेची प्रसूती झाली. दुर्दैवाने बाळ काही वेळातच मरण पावले.
या घटनेने संताप व्यक्त करण्यात आला. माहिती मिळताच जगताप यांनी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. त्यांनाही या अधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली. जगताप यांनी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याशी संपर्क साधून याबाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या संदर्भात डॉ. बोरगे यांच्याशी बऱ्याचदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो झाला नाही. त्यांनी फोनच उचलला नाही.