रेल्वे इंजिनांवर प्रथमच तिरंगा

स्वातंत्र्यानंतर तब्बल ६९ वर्षांनी भारतीय रेल्वे इंजिनांवर तिरंगा रंगवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आल्याने पहिल्यांदाच रेल्वेच्या इंजिनांवर राष्ट्रध्वज दिसू लागेल. नागपुरातील अजनी आणि मोतीबाग इंजिन देखभाल-दुरुस्ती केंद्राने ३८ इंजिनांवर तिरंगा रंगवला आहे.

देशाची जीवनवाहिनी समजण्यात येणाऱ्या भारतीय रेल्वेच्या इंजिनांवर दर्शनी भागात राष्ट्रीय ध्वज लावण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राष्ट्रभक्ती आणि राष्ट्राभिमान प्रवाशांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये जागृत होण्यासाठी ही कल्पना मांडली आहे.

ब्रिटिशांनी भारतात पहिली गाडी एप्रिल १८५३ ला मुंबईत बोरीबंदर ते ठाणे चालवली. देशात आजही बहुतांश मार्ग बिटिशकालीनच असून त्याच परंपरा कायम आहेत. भारतात प्रवासी रेल्वे सुरू होण्यास १६३ वर्षे आणि स्वातंत्र्याची सत्तरी गाठत असताना भारतीय रेल्वेतील इंजिनांवर तिरंगा दिसू लागला आहे. नागपुरातील अजनी विद्युत लोकोशेडमध्ये १३ इंजिनांवर तिरंगा रंगवण्यात आला आहे. या लोकोशेडमध्ये २१७ इंजिन्स आहेत. हे देशभरातील विविध मार्गांवर धावतात. इंजिन देखभाल-दुरुस्तीला आल्यावर त्यावर राष्ट्रध्वज रंगवण्यात येत आहेत.

मोतीबाग डिझेल शेडमध्ये नॅरोगेज आणि ब्रॉडगेड इंजिनांची देखभाल-दुरुस्ती केली जाते. येथे आतापर्यंत १४ ब्रॉडगेज आणि ११ नॅरोगेज इंजिनांवर तिरंगा रंगवण्यात आला आहे. तो रंगवताना ध्वजसंहितेचे पालन करण्यात येत आहे.

शिवाय, हा तिरंगा नेहमी स्वच्छ राहील, याची काळजी घेण्याचे निर्देश संबंधित इंजिनचालकाला सांगण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने देशभरातील सर्व रेल्वे इंजिनांवर तिरंगा रंगवण्यात येणार आहे. देशात सुमारे १४ हजार रेल्वे इंजिन्स असून यात सुमारे साडेतास हजार विद्युत इंजिन्स आणि साडेसहा हजार डिझेल इंजिन्स आहेत. त्यानंतर पुढील टप्प्यात रेल्वे डब्यांवरही तिरंगा दिसणार आहे. या संदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील म्हणाले की, रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वे नागपूर विभागातील विद्युत लोकोशेड, अजनी लोकोशेडमध्ये इंजिनांवर भारतीय राष्ट्रीय ध्वज चित्रित करण्यात आला आहे. अजनीचे १३ इंजिन्स राष्ट्रीय ध्वजासह विविध रेल्वे मार्गांवर धावत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *