कांदा गडगडला!

घाऊक बाजारात सहा रुपये किलो; राज्यातील शेतकरी संकटात

नाशिक, पुण्यासह गुजरात मध्य प्रदेशात झालेले कांद्याचे विक्रमी उत्पादन, संततधार पावसामुळे साठवणुकीवरील मर्यादा आणि पुढील महिन्यात येणाऱ्या नव्या पिकामुळे कांद्याचा भाव गडगडला आहे. घाऊक बाजारात कांदा किलोमागे सहा रुपयांपर्यंत घसरला आहे. यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

नाशिक, पुणे आणि सोलापूर जिल्ह्य़ात कांद्याचे विक्रमी पीक आल्याने जुन्या कांद्याची आवक वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारात सध्या १२५ ट्रक भरून कांद्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात कांदा सहा ते सात रुपये किलोवर घसरला आहे. वाहतूक खर्च वगळून किलोमागे तीन-चार रुपये शेतकऱ्यांच्या हाती पडत आहेत.

पुढील महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कांद्याचे नवे पीक बाजारात दाखल होईल. राज्यात काही दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडून गेला. राज्यात मुबलक कांदा असताना गुजरात, मध्य प्रदेशबरोबरच दक्षिणेकडील काही राज्यांतही कांद्याचे चांगले पीक आले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही कांद्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन झाल्याने कांदा निर्यातील खीळ बसली आहे. यामुळे ग्राहकांना कांदा स्वस्तात मिळणार असला तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

लसूण महागली, बटाटा स्वस्त

कांद्याचा भाव घसरला असताना लसूण महागली आहे. दोन महिन्यांपूर्वी ७० ते ८० रुपये प्रति किलो असलेली लसूण आता घाऊक बाजारातच १००-१२५ रुपये किलोवर पोहोचली आहे. गुजरात, इंदोरमधून यंदा लसणाची आवक कमी झाली आहे. बटाटा १५ ते १७ रुपये किलो असून, नवीन उत्पादन लवकरच बाजारात येणार असल्याने हा दर सणासुदीत आणखी कमी होणार आहे.

राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. शेजारच्या राज्यांतही मोठय़ा प्रमाणावर पीक आल्याने कांद्याचा भाव घसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *