मुंबईत शुक्रवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणा-या लोकल सेवेवर परिणाम झाला असून, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सायन दादर स्थानकादरम्यान पाणी साचल्यामुळे सीएसटीकडे येणारी वाहतूक ही ठप्प झाली आहे. सायन रेल्वे ट्रकवर पाच ते सहा इंच पाणी साचले आहे त्यामुळे वाहतूक कोलमडली आहे.तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पश्चिम रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने तर हार्बर मार्गावरील वाहतूकही १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. मुसळधार पावसाने रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा उशिराने सुरू आहे. अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते आहे. मुंबई शहरात शुक्रवारी सकाळी दोन तांसात ३१ मिमी तर उपनगरांमध्ये १९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
एकीकडे रेल्वे वाहतूक उशिराने सुरू असताना दुसरीकडे रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. परळ, हिंदमाता, दादर या ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पूर्व द्रुतगती आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसत असून, दक्षिण मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसते आहे. पालघर, वसई, विरार, ठाणे कल्याण, नवी मुंबई भागात शुक्रवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीचाही खोळंबा झाला. पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. जेव्हीएलआर, मुलूंड टोल नाका ते कांजूरमार्गावरही वाहतूक कोंडी झाल्यामुळे तेथील वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे.