राज्यातील बेशिस्त वाहनचालक आणि मालकांना वठणीवर आणण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. हेल्मेट न घातल्यास यापुढे 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे निवेदन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधिमंडळात केले.
वाहतुकीचे नियम तोडल्यास सध्या दंडाची रक्कम अगदी कमी आहे. वाहनचालकांवर धाक नसल्याने त्यांच्याकडून वारंवार नियम तोडले जात असल्याचे दिसून येते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती कारण्यात आली आहे. हेल्मेट न घालणे, परवाना नसताना गाडी चालविणे, शारीरिक-मानसिकदृष्ट्या अक्षम असताना वाहन चालविणे आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचे उल्लंघन करणे या कारणांसाठी 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. वाहनाची नंबर प्लेट नीट न लिहिता “दादा, मामा, बाबा, भाई, पवार, पाटील‘ लिहिल्यास, तसेच वाहनास रिफ्लेक्टर नसणे, टेल लॅम्प नसणे, वेगाने वाहन चालविणे, अनधिकृत व्यक्तीच्या हातात वाहन देणे, वाहनात अवैध बदल करणे, विनानोंदणी दुचाकी वाहन चालविल्यास एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. त्याचप्रमाणे वाहनांची शर्यत लावणे, विनानोंदणी चारचाकी वाहन चालविणे आणि विमा नसल्यास संबंधित व्यक्ती-मालक यांना यापुढे दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.