मुसळधार पावसामध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा ब्रिटीशकालीन जुना पुल वाहून गेला आहे. या दुर्घटनेत त्यावेळी पूलावर असणा-या दोन एसटी बसेस वाहून गेली आहेत. ही घटना मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
जयगडहून मुंबईला येणारी एमएच – २० – बीएल १५३८ आणि राजापूरहून बोरीवली येणारी एमएच – ४० – एन ९७३९ या दोन बसेस, तवेरा आणि आणखी काही वाहने वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे.
जयगड-मुंबई बसचे चालक एस. एस. कांबळे, वाहक – व्ही. के. देसाई आणि राजापूर-बोरीवली बसचे चालक इ. एस. मुंढे, वाहक – पी. बी. शिर्के आहेत. या दोन्ही बसमध्ये चालक-वाहकासह मिळून एकूण २२ प्रवासी होते.
या दोन बसेसची नोंद पोलादपुर एसटी स्थानकातून पुढे रवाना अशी आहे, मात्र या दोन्ही बसेस अद्याप महाड बस स्थानकात पोहोचलेल्या नाहीत.
एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफ शोधकार्यासाठी सहा बोटींचा वापर करणार आहे. तसेच नौदल आणि वायूदलाची मदत घेण्यात येणार आहे. हॅलिकॉप्टर्सच्या मदतीने शोध कार्य करण्यात येणार आहे.
दरम्यान, पूल वाहून गेल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक कशेडी बायपासमार्गे वळवण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी दिली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली.
राजापूर-बोरिवली आणि जयगड – मुंबई या एसटी बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी (०२१४१) २२२११८ व टोल फ्री क्रमांक १०७७ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.