मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पुल मुसळधार पावसात वाहून गेला आहे. त्या पुलावरून जाणा-या राजापूर-बोरिवली आणि जयगड- मुंबई या दोन एसटी बससह 8 ते 10 वाहने पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. या दोन्ही एसटी बसमध्ये 22 प्रवासी असल्याचं वृत्त दिलं आहे. सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल वाहून गेल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. हा पूल १०० वर्ष जुना असल्याची माहिती असून धोकादायक अवस्थेत हा पूल होता.
मुंबई गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ असलेला हा पूल वाहून गेला. हा पूल कमकुवत झाला होता. त्यामुळे पोलादपूर वरून महाड कडे येणारी 10 ते 15 वाहने पुलावरून नदीत कोसळली, आणि पुराच्या पाण्यात वाहून गेली असण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान मदत आणि बचाव कार्यासाठी पुण्याहून एनडीआरएफचे बचाव पथक रवाना झाले आहेत. एनडीआरएफच्या टीम्स दाखल झाल्यानंतर ख-या अर्थाने बचावकार्य सुरु होईल.
जयगड-मुंबई आणि राजापुर-मुंबई या दोन बसेसची नोंद पोलादपुर एसटी स्थानकातून पुढे रवाना अशी आहे; मात्र या दोन्ही बसेस अद्याप महाड बस स्थानकात पोहोचलेल्या नाहीत. यावरुनच त्या वाहून गेल्याचे सांगीतले जात आहे. या दोन बसेस बरोबर अन्य खाजगी वाहने नेमकी किती याचा आकडा अद्याप निश्चित होवू शकलेला नाही.
मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा हा पूलच वाहून गेल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे, अशी माहिती मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद देशमुख यांनी घटनास्थळावरून दिली. अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे रेस्क्यू आॅपरेशन सुरू आहे. महाड आणि पोलादपूरला जोडणारा पूल वाहून गेल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.
सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहनचालकांनी सहकार्य करण्याचं आवाहनही रायगड पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी केले असून, महाड-पोलादपूरला जोडणारा पूल वाहून गेल्याने रत्नागिरीहून वाहतूक कशेडी बायपास मार्गे वळवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पुरात 10 ते 15 गाड्या वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
काळोख असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याची माहिती महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद देशमुख यांनी दिली आहे. ते स्वतःच्या सहका-यांसह घटनास्थळी सर्च ऑपरेशन राबवत आहेत. वाहतूक कधी सुरळीत होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे शक्यतो प्रवाशांनी मुंबई-गोवा महामार्गावरून
प्रवास करणं टाळावं, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
रात्रीच्या अंधारात नेमकी किती जिवीतहानी झाली ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. प्रशासनाकडून जलदगतीने मदत आणि बचावकार्य सुरु राहील असे मुख्यमंत्र्यांनी टिवट करुन सांगितले.