दिल्ली ते मुंबई धावणाऱ्या टॅल्गो ट्रेनच्या पहिल्या चाचणीस सोमवारीपासून प्रारंभ होणार आहे. ही ट्रेन दिल्ली येथून ठिक रात्री 8 वाजता मुंबईकडे प्रस्थान करणार आहे. त्यानंतर 13 तासांनी टॅल्गो ट्रेन मुंबई सेंट्रल स्थानकावर पोहोचेल.
टॅल्गो ट्रेनची पहिली चाचणी ही तासी 130 कि.मी. वेगाने 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर 11 आणि 12 ऑगस्टला पुढील चाचणी होणार आहे. त्यावेळी ट्रेनचा वेग तासी 20 किलोमिटरने वाढवून 150 कि.मी. ताशी करण्यात येणार आहे. साधारणतः टॅल्गो ट्रेनचा ताशी वेग 200 किमी आणि जास्तीत जास्त 350 किमी आहे. मात्र, भारतातील रेल्वे ट्रॅकची अवस्था पाहता, कालांतराने हा वेग वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सध्या नवी दिल्ली-मुंबई धावणारी सुपर फास्ट राजधानी एक्सप्रेस ही 1384 किमीचे हे अंतर पार करण्यासाठी 16 तासांचा कालावधी घेते. या एक्सप्रेसचा कमीत कमी 91 किमी आणि जास्तीत जास्त 130 किमी ताशी वेग आहे. 9 डब्ब्यांच्या या ट्रेनमुळे 30 टक्के विजेची बचत होणार आहे. या रेल्वेत दोन विशेष बोगी असणार आहेत. तर खुर्च्यांचे चार बोगी असणार आहे. तसेच कॅफेटरियाचीही सोय या रेल्वेत करण्यात आली आहे. चाचण्या यशस्वी झाल्या, तर लवकरच मुंबई-दिल्ली मार्गावर टॅल्गो ट्रेन धावताना दिसेल.
तीन मार्गावर धावणार…
स्पेनची रेल्वे कंपनी भारतात तीन मार्गांवर ताशी 200 किमी वेगाने धावणाऱ्या टॅल्गो रेल्वे सुरू करण्याच्या विचारात आहे. यात बरेली ते मुरादाबाद, पलवाल ते मथुरा व मुंबई ते दिल्ली अशा मार्गांचा समावेश आहे.वजनाने हलके व अत्याधुनिक डबे या रेल्वेस असतील. मथुरा-पलवाल या मार्गावर घेण्यात आलेली चाचणीत रेल्वे तासाला 180 किलोमिटर वेगाने धावण्यात यशस्वी ठरली आहे.