पोलिसांच्या मदतीसाठी 50 रहदारी रक्षक

वर्दळीच्या चौकात रहदारी सुरळीतपणे चालू राहण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ठेकेदारी पद्धतीने एक वर्ष कालावधीसाठी 100 रहदारी रक्षक कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु काही चौकात रहदारी आणि वाहतूक वाढल्याने रहदारी रक्षक अपुरे पडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आणखी 50 रहदारी रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत.
महापालिका हद्दीत विविध ठिकाणाहून शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची अहोरात्र ये-जा सुरू असते. त्यासाठी महापालिका हद्दीतील विविध सिग्नल असलेल्या तसेच सिग्नल नसलेल्या जास्त वर्दळीच्या चौकात रहदारी सुरळीतपणे चालू रहावी, याकरिता वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ठेकेदारी पद्धतीने रहदारी रक्षक कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2016 या एक वर्षासाठी 100 रहदारी रक्षक कार्यरत आहेत.
शहरातील ज्या चौकातील व रस्त्यावरील रहदारी पूर्वी कमी होती, त्या चौकातील व रस्त्यांवरील रहदारी वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही वाढली आहे. परंतु, वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी सध्याचे 100 रहदारी रक्षक अपुरे पडत आहेत. सध्या एलएमसी सिक्युरिटी फोर्सचे 75 रहदारी रक्षक व श्रीकृपा सर्व्हिसेस यांचे 25 रहदारी रक्षक यांना वाहतूक पोलिसांच्या मदतीकरिता सकाळी नऊ ते दुपारी एक व सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत तैनात करण्यात येते. आता आणखी 50 रहदारी रक्षक नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारच्या निर्णयानुसार, पुन्हा कर्मचारी नियुक्त करायचे झाल्यास सुरुवातीच्या संख्येच्या केवळ 50 टक्के कर्मचारी नियुक्त करता येतील, असा नियम आहे. त्यानुसार, एलएमसी सिक्युरिटी फोर्सचे 38 आणि श्रीकृपा सर्व्हिसेस यांचे 12 असे 50 रहदारी रक्षक घेण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *