मुंबईच्या नौदल गौदीमध्ये उभ्या असलेल्या आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीवर १४ ऑगस्ट २०१३ रोजी झालेले स्फोट, तिला मिळालेली जलसमाधी या दुर्घटनेनंतर नौदलाने सखोल चौकशी करून त्यांच्या अग्निशमन यंत्रणेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्या दुर्घटनेपासून नौदलाने खरोखरच काही धडा घेतला आहे का, असा प्रश्न मंगळवारच्या दुर्घटनेनंतर चíचला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे दोन वाजता ही आग भडकल्यानंतर नौदलाची अग्निशमन यंत्रणा लगेचच कार्यरत झाली. त्याचवेळेस नौदलाने सर्वप्रथम मुंबई पोर्ट ट्रस्टकडे मदत मागितली. मात्र त्यांनी इंदिरा गोदीतून पाठविलेल्या दोन्ही टगबोटींवर पुरेशी अग्निशमन यंत्रणा नव्हती. त्यानंतर लगेचच शिपग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे मदत मागण्यात आली. त्यांनी दोन बहुपयोगी नौका मदतीला पाठविल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बहुपयोगी नौकांवरही मोठय़ा आगींशी झुंजण्यासाठी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नव्हती. नौदल अग्निशमन यंत्रणा लगेचच कार्यरत झाली, तरीही गस्तीनौकांना जलसमाधी मिळण्यापासून रोखण्यात त्यांना अपयश आले.
आयएनएस सिंधुरक्षकच्या दुर्घटनेनंतरही आपण त्यातून योग्य तो धडा घेतला नसल्याचे चित्र या दुर्घटनेनंतर निर्माण झाले आहे.
या वेगवान गस्तीनौकांचा वापर मुंबईलगत असलेल्या तेलविहिरींच्या संरक्षणासाठीही केला जातो. नौदलाच्या पश्चिम विभागाकडे एकूण सात गस्तीनौका होत्या. त्यातील दोन दोघांना मंगळवारी जलसमाधी मिळाल्याने त्यांची संख्या आता पाचवर आली आहे. या संबंधी नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अशा प्रकारची दुर्घटना उद्भवली की अधिक हानी होऊ नये म्हणून आम्ही लवकरात लवकर ज्यांच्याकडून मदत मिळेल अशा सर्वाशी संपर्क साधतो. आमच्याकडे या प्रकारच्या दुर्घटनांना सामोरे जाण्याची व्यवस्था आहे. परंतु, अशा परिस्थितीत आजुबाजूला ज्या यंत्रणा कार्यरत आहेत त्यांच्याकडून मागितली जाते. त्याप्रमाणे आम्हीही शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे मदत मागितली.