मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प येत्या सहा वर्षांत पूर्ण होणार असू या प्रवासाचे शुल्क विमान प्रवासापेक्षा कमी असेल, असे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज लोकसभेत सांगितले. मुंबई-अहमदाबाद या मार्गावर येत्या 2022 या वर्षापर्यंत हायस्पीड ट्रेन धावणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महागडा असल्याने हा प्रवास देखील सर्वसामान्यांना परवडणारा नसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र सुरेश प्रभू यांनी हा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा असेल, असे स्पष्ट केले. हायस्पीड बुलेट ट्रेनचा हा 508 किलोमीटरचा मुंबई-अहमदाबाद प्रवास केवळ दोन तासांचा असेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे अहमदाबाद आणि मुंबई ही दोन महत्त्वाची आर्थिक महानगरे जोडली जाणार आहेत.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ही माहिती दिली. सध्या एक्सप्रेस रेल्वेने हा प्रवास करण्यासाठी 7 तास लागतात. बुलेट ट्रेनचा वेग ताशी 350 किलोमीटर असेल. बुलेट ट्रेनबाबत यापूर्वी मोठ्या प्रमाणात खर्च होणार असल्याचे सांगून या प्रकल्पास खो घालण्याचे काम काही नेत्यांकडून झाले. देशातील दुसर्या भागावर या प्रकल्पामुळे परिणाम होऊ शकतो, असे काही नेत्यांचे म्हणणे होते. यावर प्रभू यांनी कुठल्याही राज्यावर अन्याय करण्याचा हेतू नसून प्रत्येक राज्याला पूर्वीच्या तुलनेत जास्त निधी देण्यात आल्याचे सांगितले.
एकूण खर्च 97 हजार 636 कोटी रुपये
मोदी सरकार अतिजलद रेल्वे प्रकल्पासाठी जपानकडून तंत्रज्ञान व आर्थिकदृष्ट्या मदत घेत आहे. जपानच्या आंतरराष्ट्रीय एजन्सीने या प्रकल्पाचा अभ्यास यापूर्वीच केलेला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 97 हजार 636 कोटी रुपये आहे. यातील 81 टक्के हिस्सा कर्ज स्वरुपात जपानला देण्यात येणार आहे.
9 मार्गांवर सेमी हायस्पीड ट्रेन
रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले, दिल्ली-चंदीगड, चैन्नई-बंगळुरू-म्हैसूर, दिल्ली-कानपूर, नागपूर-विलासपूर, मुंबई-गोवा, मुंबई-अहमदाबाद, चैन्नई-हैदराबाद आणि नागपूर-सिकंदराबाद या मार्गांवरही सेमी हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.