व्यापा-याकडून शेतक-यांचा छळ

व्यापा-याकडून  अडत घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने बुधवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापार्‍यांनी अचानक भाजीपाला घेण्यास नकार दिला. शेतीमालाचे दरही पाडण्यात आल्याने संतप्त शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या कार्यालयासमोर रस्त्यावर भाजीपाला फेकून संतप्त भावना व्यक्त केल्या. महामार्गावरही रास्ता रोको आंदोलन केले. पणनमंत्री ना. सुभाष देशमुख यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार सुरू झाल्याने शेतकर्‍यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत.

राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच शेतीमाल खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांकडून अडत व अन्य कर घेण्याचे आदेश दिले होते. व्यापार्‍यांनी सुरुवातीस अडतदारांना पुढे करून अडतदारांचा संप घडवून आणला होता. याप्रकरणी राज्य शासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अडतदारांनी संप मागे घेतला होता. त्यानंतर दोन दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत होते.

राज्य शासनाच्या आदेशानुसार अडतदारांनी शेतीमाल खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांकडून अडत घेण्यास सुरुवात केल्याने नाराज झालेल्या व्यापार्‍यांनी सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संगनमताने शेतीमालाचा दर पाडण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी तर चक्क शेतीमाल खरेदी करण्यास नकार देण्यात आल्याने शेतकर्‍यांचा संताप अनावर झाला.

शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या आवारातील रस्त्यावर भाजीपाला टाकून कार्यालयात ठिय्या मारल्याने प्रशासनाने पोलिस बंदोबस्त मागवून हे आंदोलन  नियंत्रणात आणले. व्यापार्‍यांकडून अडत घेण्यासाठी अडतदार, व्यापारी यांचा विरोध आहे. बाजार समिती प्रशानाकडूनही यास अभय देण्यात येत असल्याची भावना पसरली आहे. शासनाच्या निर्णयाप्रमाणे बाजार समितीच्या प्रशासनाने अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.

सहकार व पणनमंत्री ना. देशमुख यांच्या जिल्ह्यातच व्यापारीवर्गाकडून शेतकर्‍यांचा छळ सुरू झाला आहे. राज्य शासनाच्या धोरणाला विरोध करण्यासाठी चक्क शेतकर्‍यांचाच छळ करण्याचे धाडस व्यापार्‍यांकडून सुरू झाल्याने या प्रकरणी ना. देशमुख यांनी तातडीने लक्ष घालून शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *