महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना यंदा वेळेत साहित्य मिळत आहे. साहित्य वाटप अगदी अंतिम टप्प्यात असून, उर्वरित वाटप 30 जुलैपर्यंत पूर्ण होईल. आता रेनकोट वाटपानंतर थंडीचेही नियोजन सुरू झाले असून, स्वेटरसाठी 15 ऑगस्टनंतर पुरवठा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण मंडळ सभापती चेतन भुजबळ यांनी दिली.
महापालिका शाळांतील साहित्य वाटपाची नेहमीच चर्चा सुरू असते. यंदा मात्र नेहमीपेक्षा जलद गतीने साहित्य वाटप केल्याची चर्चा आहे. दिलेली मुदत पूर्ण होण्याआधीच हे साहित्य वाटप अगदी अंतिम टप्प्यात आले आहे.
दर वर्षी काही ना काही कारणाने मुलांना साहित्य वाटपाला उशीर होतो अथवा ते साहित्य वाटपापासून वंचित राहतात. यंदा विद्यार्थ्यांना या साहित्याचा फायदा व्हावा यासाठी त्यांना वेळेत साहित्य देण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. शहरात 15 जूनपासून शाळा सुरू झाल्या. शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि स्वेटर वाटपासाठी शाळा सुरू झाल्यानंतर 90 दिवसांची मुदत असते. ही मुदत 15 सप्टेंबरपर्यंत आहे, तर इतर शालेय साहित्य वाटपासाठी आणि रेनकोटसाठी 15 ऑगस्ट म्हणजे तीन महिन्यांची (90 दिवसांची) मुदत असते. त्यानुसार वाटप सुरू असून, हे अंतिम टप्प्यात आलेले वाटप 30 जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे.
नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पालिका शाळांत काही विद्यार्थ्यांचे प्रवेश होत आहेत. त्यामुळे काही वेळा साहित्य वाटपास विलंब होतो, तर काही वेळा एक-दोन विद्यार्थ्यांसाठी पुन्हा साहित्य वाटपाला शाळेत येणे शक्य होत नाही. ही कंत्राटदारांची अडचण लक्षात घेऊन लवकरात लवकर वाटप करण्यात आले.