अतिरेकी हल्ल्यातून सोलापुरातील ६० भाविक बचावले

भयानक शांतता रस्ते मोकळे…काश्मीर हमारा हैं… वानी को किसीने मारा नही वो शहीद हुआ हैं…वानी की जयजयकार हो़.. वानी हमेशा अमर रहे…अशी गर्जना देणाऱ्या तरूणांनी भर रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरूवात केली़ यावेळी या परिसरातून जाणाऱ्या यात्रेकरूंच्या गाड्याही पेटवून देत दगडफेकीचा वर्षाव केला़ यात्रेकरूंच्या गाड्याही पेटविण्याच्या प्रयत्नात ते तरूण होते़ इतक्यात पावसाने जोरदार सुरूवात केली अन् विजेच्या कडकडाटामुळे संतप्त झालेल्या तरूणांनी तेथून पळ काढला़ त्यामुळेच आम्ही वाचलो अशी भावना प्रत्यक्षदर्शी ह.भ.प निवृत्ती सिद्राम कांबळे यांनी बोलून दाखविली़.

सोलापुरातील ६० जण श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय संस्थेकडून अमरनाथ यात्रेसाठी १९ जून रोजी सोलापुरातून रवाना झाले होते़ माहुरगड, रामतीर्थ, काशी, मथुरा, द्वारका, ऋषीकेश, गंगा, गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वारला भेट देऊन दर्शन घेतले़ त्यानंतर १० जुलै रोजी अमरनाथ येथे दर्शनासाठी निघालो़ १३ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास काश्मीरमध्ये पोहोचलो़ त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन १४ जुलै रोजी अमरनाथ येथील शिवलिंगाचे दर्शन घेऊन तिथेच मुक्काम केला़ १५ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास सोलापूरकडे येण्यास निघालो होतो़ काश्मीरपासून काही अंतरावर असलेल्या नागमणी गुंज या गावाजवळील पेट्रोलपंपाजवळ दीडशे ते दोनशे तरूणांनी या परिसरात गोंधळ घालण्यास सुरूवात केली़ यावेळी त्यांच्या हातात काठ्या, तलवारी होत्या़ काश्मीर जिंदाबादच्या घोषणा देत वीना हमारा मरा नही वो शहीद हुआ हैं़़़चा नारा देत दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरूवात केली़ यावेळी आमच्याही गाडीवर जोरदार दगडफेक करण्यात आली़ या दगडफेकीमुळे सोलापूरहून आलेले सर्व भाविक भयभीत होऊन सीटखाली जाऊन बसले़ काही वेळाने जोरदार पावसाने सुरूवात केली़ विजेचा कडकडाट सुरू झाल्याने त्या तरूणांनी या परिसरातून पळ काढला़ जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आलेल्या तरुणांच्या कचाट्यातून वाचल्याने सोलापुरातील ६० भाविकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ आमच्याबरोबर १० ते १५ यात्रेकरूंच्या गाड्या या कचाट्यात अडकल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी ह.भ.प निवृत्ती कांबळे यांनी दिली़.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *