पोलिओनंतर आता धनुर्वातापासूनही मुक्तता

देशाला पोलिओपाठोपाठ आता धनुर्वात या आजारापासून मुक्तता मिळाली आहे, अशी घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. धनुर्वात या संसर्गजन्य आजाराने काही वर्षापूर्वी नागरिकांना हैराण करून सोडले होते. देशातील या आजाराचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र व राज्य स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता धनुर्वात आजाराच्या रुग्णांची संख्या शून्य गाठण्यास सरकारला यश मिळाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

धनुर्वात हा क्लॉस्ट्रिडिअम टिटॅनो नावाच्या जीवाणूंमुळे होतो. हे जीवाणू मातीत अधिक काळ जिवंत राहतात. पायाला जखम झालेली असताना आणि तसेच मातीतून चालल्यास या जीवाणूंचे विष जखमेवाटे शरीरात प्रवेश करून स्नायूवर आघात करायला सुरुवात करते. त्यामुळे स्नायू वाकले जातात.

कधी-कधी ते आतल्या बाजूला अधिक वाकले जातात. त्यांना धनुष्याचा आकार प्राप्त होतो. अनेकदा चेतासंस्थेवर परिणाम होऊन झटके येतात. यात तोंडाच्या जबडय़ाचे स्नायू आखडले जातात. त्यानंतर हळूहळू याचा परिणाम शरीरावर होऊ लागतो. पण या आजारासंदर्भात विविध स्तरावर करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे या आजाराच्या रुग्णांमध्ये घट नोंदवण्यात आली आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफतर्फे देशाला धनुर्वातमुक्तीचे प्रशस्तिपत्रही देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *