संचारबंदी झुगारून काश्मीर खोऱ्यातील विविध भागांत उसळलेल्या हिंसाचारात हल्लेखोरांनी पोलिस ठाण्यांवर गोळीबार केला तसेच हातबॉंबने भिरकावले. त्यात आठ जवानासंह 15 जण जखमी झाले. काश्मीरमधील अशांततेमुळे अमरनाथ यात्रेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“हिज्बुल मुजाहिदीन‘चा म्होरक्या बुऱ्हाण वाणी चकमकीत ठार झाल्यानंतरचा आजचा पहिला शुक्रवार होता. सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यातील सर्व दहा जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली होती. मात्र बारामुल्ला, सोपोर, रफियाबाद, बंदीपुरा, कुलगाम, पुलवामा आदी जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जमावाने संचारबंदी झुगारून दगडफेक आणि दंगल सुरू केली. बारामुल्ला जिल्ह्यातील देलिना येथे गस्ती पथकाच्या जवानांवर सकाळी जमावाने केलेल्या दगडफेकीत तीन जवान जखमी झाले. जमावाला पांगविण्यासाठी जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले. सोपोर येथे दगडफेक करणाऱ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईत चार जण जखमी झाले. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथील यारीपोरा भागात जमावाने पोलिस ठाण्यावर दगडफेक आणि गोळीबार केला. त्यातील कोणीतरी पोलिस ठाण्यावर हातबॉंब फेकले.