भाज्यांचा तुटवडा

व्यापार्‍यांनी बेमुदत बंद पुकारल्याने मुख्य बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी किरकोळ बाजारात भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती उद्भवल्याने फळभाज्यांचे दर कडाडले आहेत. त्याचा सर्वात जास्त फटका ग्राहकांना बसत असून, किलोचे दर 150 रुपयांवर, तर पालेभाज्यांचे गड्डीचे दर 30 रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

बाजार नियमनमुक्तीच्या निषेधार्थ घाऊक व्यापार्‍यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. त्यामुळे रोजच्या तुलनेत खूपच कमी आवक होत आहे. जी आवक होत आहे, त्यात कांदा-बटाट्यांची आवक अधिक आहे. इतर प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्यांची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात माल उपलब्ध होत नसल्याने, मंगळवारी सर्वच प्रकारच्या भाज्यांचे दर कडाडले होते. मुख्य बाजारातील आवक न वाढल्यास किरकोळ बाजारातील भाज्यांचे दराचे चित्र आणखी भीषण होणार असल्याचा अंदाज किरकोळ विक्रेते व्यक्त करीत आहेत. शहरातील मुख्य बाजारात पुणे विभागासह परराज्यातून आवक होत असते. मात्र, व्यापार्‍यांनीच बंद पुकारला असल्याने शेतकरी माल विक्रीला आणण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत परराज्यातील आवक पूर्णत: थांबली आहे. परिणामी बाजार समिती प्रशासनाने शेतकर्‍यांना विक्रीसाठी माल आणण्याचे आवाहन करूनही त्याचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याचेच चित्र आहे. व्यापार्‍यांनी आणखी काही दिवस बंद सुरूच ठेवल्यास ग्राहकांचे मात्र पुरते हाल होणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर बंदवर तोडगा निघणे ग्राहकांच्या हिताचे ठरणार आहे.

याबाबत भाज्यांचे किरकोळ विक्रेते सचिन काळे म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून पालेभाज्या व फळभाज्या उपलब्ध होत नसल्याने, मिळेल तेवढ्याच मालाची विक्री करावी लागत आहे. मागणी अधिक असल्याने आहे त्या मालाची लगेच विक्री होत आहे. त्यामुळे फळभाज्यांचे दर 150 रुपयांपर्यंत तर पालेभाज्यांचे गड्डीचे दर 30 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. मुख्य बाजारातील आवक न वाढल्यास दरात आणखी मोठी वाढ होणार आहे. माल उपलब्ध होत नसल्याने किरकोळ बाजारातील परिस्थिती बिकट झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *