मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा तपशील येत्या आठ दिवसांमध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. ही पुनर्रचना करताना मतदारसंघाची संख्या कायम राहणार आहे. परंतु शहरातील मतदारसंघांची संख्या सहाने कमी होऊन पश्चिम उपनगरात चार व पूर्व उपनगरात दोनने वाढ होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरूआहे. या निवडणुकीसाठी प्रथम मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच याची अधिसूचना जारी होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर जनतेच्या हरकती व सूचना जाणून घेत महापालिका मतदारसंघांची रचना निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य निवडणूक आयोगाने संगणकीय सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
मुंबई महापालिका मतदारसंघाची रचना ही सध्या दहिसरपासून सुरूहोत आहे. परंतु आगामी निवडणुकीसाठी मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी शहरापासून याची सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिका-यांकडून मिळते. शहराकडून उपनगराच्या दिशेने मतदारसंघांची पुनर्रचना करताना शहरातील सहा मतदारसंघ कमी होण्याची शक्यता आहे. ५० हजार लोकसंख्येमागे एक मतदारसंघ अशी रचना होणार आहे. त्यामुळे शहरामधील सहा मतदारसंघ कमी होताना उपनगरांमध्ये सहा मतदारसंघ वाढतील. शहरांमध्ये २४ लाख, पश्चिम उपनगरात ५५ लाख आणि पूर्व उपनगरांमध्ये ४५ लाख लोकसंख्या आहे. मुंबईत २२७ मतदारसंघच कायम राहणार आहेत. परंतु शहरातील लोकसंख्या कमी होत असल्यामुळे सहा मतदारसंघ कमी होऊन पश्चिम उपनगरात चार तर पूर्व उपनगरांमध्ये दोन मतदारसंघ वाढणार असल्याचे अधिका-यांकडून समजते.
पुढील महिन्यात मतदारसंघांचे आरक्षण
महापालिका मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे काम या महिन्यात पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यात मतदारसंघांचे आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून त्यानंतर मतदारसंघनिहाय आरक्षण जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे एकदा का मतदारसंघांचे आरक्षण जाहीर झाले की ख-या अर्थाने पक्षांमध्ये उडय़ा मारण्याचे प्रकार वाढले जाणार आहेत. त्यामुळे आरक्षणाची वाढ सर्वच जण आतुरतेने वाट पाहात आहेत.