मुंबईतील रस्ते घोटाळा प्रकरणात पोलिसांनी दहा लेखा परीक्षकांना अटक केली आहे. रस्ते घोटाळाप्रकरणातील अटकेची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा रस्ते घोटाळ्याशीसंबंधित दहा लेखा परीक्षकांना अटक केली.
रस्ते बांधकामांची कंत्राटदारांनी महापालिकेस सादर केलेली बिले पडताळून न घेतल्याचा आरोप लेखा परीक्षकांवर आहे. मुंबईतील रस्ते बांधणीत तब्बल ३५२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आरोपांच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने मुंबईतील ३४ रस्त्यांची पाहणी करून ती कामे निकृष्ट असल्याचा अहवाल दिला होता.
अहवाल सादर झाल्यानंतर पोलिसांत फसवणुकीची तक्रार देखील दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी पहिली कारवाई करत बुधवारी दहा लेखा परीक्षकांना अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, यापुढे पालिकेचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार देखील कचाट्यात सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.