प्रवाशांची सुरक्षेच्या मुद्दय़ांवरून घसरलेली माथेरानची मिनी ट्रेन सेवा महिन्याभरानंतरही रुळावर आलेली नाही. रेल्वे मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही रेल्वे सेवा सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलेलं नाही. ऐन पर्यटन हंगामात रेल्वे सेवा बंद पडल्याने माथेराच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवा तरी आधी सुरू करा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. माथेरान येथून नेरळ येथे जात असलेल्या मिनी ट्रेनचे प्रवासी डब्बे एकाच आठवडय़ात दोन वेळा नॅरोगेज रुळावरून खाली उतरले होते. त्यानंतर लगेच प्रवाशांच्या सुरक्षेचे कारण पुढे करीत नेरळ-माथेरानही घाटात धावणारी मिनीट्रेन बंद करण्यात आली. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले होते. यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी यात हस्तक्षेप करीत माथेरानची रेल्वेसेवा बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही दिली होती. अत्याधुनिक प्रणालीसह मिनी ट्रेन सेवा पुन्हा सुरू केली जाईल. यात एअरब्रेकप्रणाली, तीन नवीन इंजिन आणि दहा प्रवासी डब्यांचा समावेश असेल असे जाहीर करण्यात आले होते. नेरळ ते माथेरान रेल्वेसेवा सुरू होईपर्यंत अमन लॉज ते माथेरान शटल सेवा तातडीने सुरू केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. याबाबतचे प्रसिद्धी पत्रकही जारी करण्यात आले होते. परंतु एक महिना उलटून गेला तरी ना रेल्वे सेवा सुरळीत झाली, ना शटल सेवा सुरू झाली. यामुळे पर्यटकांबरोबरच स्थानिकांमध्ये कमालीची नाराजी आहे. सर आदमजी पिरभाय यांनी या रेल्वेची स्थापना १९०७ साली केली होती. २००७ मध्ये या रेल्वेसेवेने आपल्या स्थापनेची १०० पूर्ण केली होती. २६ जुल २००५ मध्ये झालेल्या प्रलंयकारी पावसात रेल्वेचे रूळ वाहून गेल्याने ही रेल्वे सेवा खंडित झाली होती. मात्र दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ही रेल्वे सेवा सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले होते. त्यानंतर युनेस्कॉच्या जागतिक वारसा यादीत या रेल्वे सेवेचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. आता मात्र प्रवाशांच्या सुरक्षेचे कारण करीत रेल्वे प्रशासनाने ही रेल्वे सेवा बंद केली आहे. माथेरान रेल्वे ही माथेरानकरांसाठी अस्मितेचे प्रतीक आहे. माथेरानच्या अर्थकारणाचा कणा म्हणूनही रेल्वेसेवा ओळखली जात आहे.
इथे येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचे मिनी ट्रेन सेवा प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे ही रेल्वे सेवा तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. रेल्वेचे डबे घसरल्याने गेल्या ९ मेला मिनी ट्रेन सेवा बंद करण्यात आली होती. या घटनेला आता महिना लोटला आहे. मात्र रेल्वेसेवा सुरळीत करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वे प्रशासनाने रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी दोन वेळा सुरक्षा चाचण्या घेतल्या आहेत, या दोन्ही चाचण्यांमध्ये माथेरानची राणी उत्तीर्णही झाली. पण तरीही रेल्वेसेवा सुरू का झाली नाही? याचा खुलासा होऊ शकलेला नाही. माथेरानच्या राणीला झालेले दोन्ही अपघात हे नेरळ ते माथेरान मार्गावर झाले होते. त्यामुळे अमन लॉज ते माथेरान शटल रेल्वेसेवा बंद करण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेचे कारण पुढे करीत दोन्ही रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या. किमान रेल्वेमंत्र्यांच्या निर्देशानंतर तरी रेल्वे प्रशासनाने शटल सेवा सुरू करण्यास काहीच हरकत नव्हती, असे मत स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकत्रे सुनील िशदे यांनी व्यक्त केले.