भारताला अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हवा असलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमने राजधानी दिल्लीला टार्गेट करण्याचे आदेश आपल्या गुंडांना दिले आहेत. मुंबईप्रमाणेच दिल्लीत साखळी बॉम्बस्फोट करण्याचे आदेश त्याने दिल्याचे संदेश भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पकडले आहेत. दिल्लीचा आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली विधानसभा, मेट्रो रेल्वे व रेल्वे स्टेशनला टार्गेट करण्यात येण्याचे संकेत मिळत आहेत.
पाकिस्तानची आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या आश्रयाला असलेल्या दाऊदवर दिल्लीत साखळी स्फोट घडवण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी दाऊदचे गुंड तयारीला लागले असून सुरक्षा यंत्रणांनी त्याचा जोरदार माग काढण्यास सुरुवात केली आहे.
पुण्यातील एका शस्त्र माफिया व दाऊदच्या गुंडाकडून ३० मे रोजी सुरक्षा यंत्रणांना दिल्ली स्फोटाच्या कटाची माहिती मिळाली. त्यानंतर ती माहिती त्यांनी दिल्लीच्या पोलिसांना दिली. ती माहिती विविध सुरक्षा यंत्रणांना पुरवण्यात आली. या कटात सहभागी असलेल्यांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, दाऊद आतापर्यंत भारतात बनावट चलन पाठवणे, अंमली पदार्थ पाठवण्याचा धंदा करत होता. मात्र, त्याने आपले धोरण बदलले असून आता देशात दहशतवादी हल्ले करण्याचे ठरवले आहे. गुप्तचर विभागाने त्याचे काही संदेश पकडले आहेत. भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी दाऊदने काही गुंडांना हाताशी धरले आहे. विशेष करून मध्य प्रदेशातील काही जणांना याबाबतची जबाबदारी दिली असून त्यांनी याबाबत पावले उचलण्यात सुरुवात केल्याचे कळते.
दिल्ली पोलीस व अन्य सुरक्षा यंत्रणांनी अतिदक्षतेचा इशारा दिला असून दाऊदच्या गुंडांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. दिल्लीचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली मेट्रो, विधानसभा, नवी दिल्ली रेल्वे स्थानकांना संभाव्य लक्ष्य केले जाणार आहे.
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटात २५७ जण ठार झाले होते. मुंबई शेअर बाजार इमारत, एअर इंडिया बिल्डींग, आगर बाजार आदी १२ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवले होते. दाऊदचा वापर करून आयएसएस भारतात नेहमीच घातपाती कारवाया घडवते. दाऊदच्या जीवाला धोका असल्याने आयएसआयने कराचीतील फ्लिटन विभागातून त्याला अफगाण-पाकिस्तान सीमाभागात नेल्याची शक्यता आहे.
मात्र, पाकिस्तानने कायमच दाऊद आमच्या देशात वास्तव्यास नसल्याचे तुणतुणे वाजत ठेवले आहे. दरम्यान, दाऊदला भारतात आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिले होते.