येथील सरकारी जागेवरील अतिक्रमणे हटवताना आंदोलक व पोलिसांत झालेल्या गोळीबारात जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस निरीक्षक शहीद झाले असून २२ आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारानंतर पोलिसांनी ३२० जणांना अटक केली असून घटनास्थळावरून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. यात ४७ देशी कट्टा, ६ रायफल, १७८ जिवंत काडतुसांचा समावेश आहे. या हिंसाचारात जखमी झालेल्या २३ पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
जवाहरबाग परिसरातील हिंसाचाराची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गंभीर दखल घेतली असून विभागीय पोलीस आयुक्तांमार्फत या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जवाहरबाग परिसरातील सुमारे २६० एकर जागेवर गेल्या दोन वर्षापासून तीन हजारांहून अधिक लोकांनी अतिक्रमण केले होते.
जवाहरबाग परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी पोलीस फौजफाटय़ासह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी गुरुवारी सायंकाळी पोहोचले होते. यामध्ये प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस होते. यावेळी संतप्त जमावाने अचानक पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार व दगडफेक केली. यावेळी आंदोलकांकडून झालेल्या गोळीबारात पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष यादव हे शहीद झाल्याचे पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनी सांगितले. पोलिसांकडून अतिक्रमणे हटवण्याचे काम सुरू असताना आंदोलकांनी सिलिंडरचे स्फोटही घडवले. या हिंसाचारात २२ आंदोलकांचा मृत्यू झाला. यातील अकरा जणांचा मृत्यू हा आगीत होरपळून झाला. यात एका महिलेचाही समावेश आहे. कायदा-सुव्यवस्था राखताना शहीद झालेल्या दोन पोलीस अधिका-यांना पोलीस महासंचालकांनी यावेळी मानवंदना दिली.
केंद्र सरकार करणार सर्वतोपरी मदत
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबाबत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून, आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलीस अधिका-यांच्या मृत्यूबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले.
राहुल गांधी यांची अखिलेश सरकारवर टीका
मथुरा येथील हिंसारा प्रकरणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव सरकारवर टीकास्त्र डागले आहे. उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याची टीका त्यांनी केली. सरकारकडून दोषींवर कडक शिक्षा होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भाजपाने केली न्यायालयीन चौकशीची मागणी
मथुरा हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी भाजपाने केली आहे. दोन पोलिसांच्या हत्येमुळे उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीकाही भाजपाने समाजवादी पक्षाच्या सरकारवर केली आहे. मथुरेतील परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय सचिव शशिकांत शर्मा यांना हे टीकास्त्र डागले.
शहीद पोलीस अधीक्षकांच्या आईने मदत नाकारली
जवाहरबाग येथील हिंसाचारात शहीद झालेले पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी यांच्या आईने उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव सरकारने देऊ केलेली मदत नाकारली आहे. मला मदत नको, माझा मुलगा परत हवा आहे, असा टाहो या मातेने फोडला आहे. हवे तर मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडून २० लाख रुपये घ्यावेत, पण माझ्या मुलाला परत करावे, अशी मागणीही त्यांनी केली. आपला मुलगा बरेली येथे सेवेत होता. मात्र त्याला मथुरेला पाठवले व तेथेच त्याचा मृत्यू झाल्याचे या मातेचे म्हणणे आहे.
मथुरेतील हिंसाचारानंतर या मतदारसंघातील भाजपाच्या खासदार हेमामालिनी यांनी ट्विटरवर त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाची टाकलेली छायाचित्रे चांगलीच वादात सापडली. या छायाचित्रांवरून त्यांना डाव्यांसह विरोधी पक्षांनी टीकेचे लक्ष्य केल्यानंतर त्यांनी ही छायाचित्रे तत्काळ हटवली. ‘मी नुकतेच मथुरेतून आले व ही बातमी आपल्या कानावर आली. मी, या घटनेने प्रचंड दु:खी झाले असून या घटनेत शहीद झालेल्या दोन पोलीस अधिका-यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे हेमामालिनी यांनी सांगितले.