दूरचित्रवाहिनीवरील बालिका वधू मालिकेत मुख्य भूमिका बजावणारी प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणी अभिनेता-निर्माता राहुलराज सिंह याला सर्वोच्च न्यायालयाने आज दिलासा दिला. प्रत्युषाची आई शोमा बॅनर्जी यांनी राहुलराजचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासंबंधी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली.
प्रत्युषा आणि राहुल राज यांच्या शेवटच्या संभाषणावरून दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते, हे दिसून येते आणि अटकपूर्व जामीन फेटाळण्यासंदर्भात कोणतेही ठोस कारण याचिकाकर्त्याकडे नसल्याचे न्यायाधीश पी. सी. घोष आणि अमित्वा रॉय यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
राहुल राजला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकांना जर कोणती अडचण असेल तर ते उच्च न्यायालयात जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करू शकतात. आम्ही या प्रकरणात अटकपूर्व जामीन रद्द करणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.