मालेगाव स्फोटांचा तपास करणारी एनआयए तपास यंत्रणा आज मुंबईच्या कोर्टात आरोपपत्र दाखल करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपपत्रात साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल श्रीकांत पुरोहित यांना क्लीन चिट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंहच्या सुटकेची शक्यता आता निर्माण झाली आहे.
याचसोबत सुरुवातीला या प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या तपासावर एनआयएने प्रश्न उभे केल्याचं समजतं आहे. तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी या प्रकरणात केलेला तपासही चुकीच्या पद्धतीने केला असल्याचं या आरोपपत्रात म्हणण्यात आल्याचं समजतं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने कर्नल पुरोहीत यांच्या देवळाली इथल्या घरात बॉम्ब ठेऊन त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचं एनआयएने आरोपपत्रात म्हटलं आहे.
याचसोबत या खटल्यातील आरोपींवरचा मोक्का हटवण्याच्या विचारातही एनआयए आहे. त्यामुळे अवघ्या काही वर्षात एनआयएने घेतलेल्या यू-टर्नवर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केला जातो आहे.