काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची तब्येत बिघडली आहे. तापाने फणफणलेल्या राहुल यांना डॉक्टरांनी दोन दिवसांची सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. परिणामी राहुल यांना पुडुचेरी, तामिळनाडू आणि केरळचा दौरा रद्द करावा लागला आहे. खुद्द राहुल यांनी याबाबतची माहिती आपल्या ट्विटर हॅण्डलवर दिली आहे. रविवारपासूनच माझी तब्येत बिघडली आहे. खूप ताप असल्याने डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुडुचेरी, तामिळनाडू आणि केरळचा दौरा रद्द करावा लागत आहे. येथील जनतेसोबत वेळ घालविण्याची संधी हुकत असल्याचे दु:ख मला आहे. मी जनतेची माफी मागतो, असे ट्विट राहुल यांनी केले आहे. दरम्यान, पुडुचेरी येथील जाहीर सभेत राहुल गांधी यांना ठार मारण्याची धमकी देणारे पत्र काँग्रेसचे नेते व्ही. नारायणस्वामी यांना मिळाले होते. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची दिल्लीत भेट घेतली आणि त्यांना राहुल गांधी यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची विनंती देखील केली. त्यानंतर आज राहुल यांचे हे दौरे रद्द करण्यात आले आहेत.