भीषण पाणीटंचाईत वांद्रयात शेकडो लिटर पाणी वाया

भीषण पाणीटंचाईत वांद्रयात शेकडो लिटर पाणी वाया

राज्यात दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांनीसुद्धा तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पालिकेने सर्वत्र पाणीकपात लागू केली आहे.

अशा पाणीटंचाईत वांद्रे पूर्व सरकारी वसाहतीत एक पाईपलाईन फुटल्यामुळे शेकडो लिटर पाणी गटारात वाहून जात आहे. त्याकडे स्थानिक नगरसेवक आणि पालिका अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

वांद्रे (पूर्व) सरकारी वसाहतीत दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे चौक आहे. तेथूनच एक मुंबई महानगरपालिकेने दिलेली पाईपलाईन आहे. सध्या येथे पालिकेची रस्ता दुरुस्तीची कामे सुरू आहेत. अशातच ही पाईपलाईन फुटली आहे. त्यामधून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असते.

जवळच गटार असल्याने हे पाणी थेट गटारातच वाहून जात आहे. काही लोक तर या पाण्याचा उपयोग आपल्या रिक्षा आणि टॅक्सी धुण्यासाठी करीत असतात. त्याचा त्रास येथून ये-जा करणा-या नागरिकांना होतो.

याकडे स्थानिक नगरसेवक आणि पालिका कर्मचा-यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळेच ऐन पाणीटंचाईत हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

मुंबईतही पाणी कपातीची झळ सोसावी लागत असतानाच अशा प्रकारे पाणी वाया जाणे याला महापालिका प्रशासन तर जबाबदार आहेच, पण मुंबईकरांनी आपली जबाबदारी ओळखत पाण्याची नासाडी थांबवणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *