दिल्ली विद्यापीठाने आपल्या पाठ्यपुस्तकात शहीद भगतसिंग यांना ‘दहशतवादी’ संबोधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृदुला मुखर्जी आणि विपीन चंद्रा यांनी लिहिलेल्या ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडीपेंडेंस’ नावाच्या या पुस्तकात ही घोडचूक करण्यात आली आहे.
भगतसिंग यांच्यासोबतच चंद्रशेखर आझाद, सूर्य सेना आणि अन्य लोक हे ‘क्रांतिकारी दहशतवादी’ होते, असे या पुस्तकात म्हटले आहे. या पुस्तकात चित्तगाव आंदोलन आणि सँडर्स हत्याकांडाला ‘दहशतवादी कृत्य’ संबोधण्यात आले आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर अनेक लेखक आणि इतिहासकारांनी पुस्तकातील हा संदर्भ हटविण्याची जोरदार मागणी केली आहे.
शून्य तासात भाजपचे सदस्य अनुराग ठाकूर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात देशातील शिक्षण संपविण्याचा आणि इतिहासाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला. यासाठी देश काँग्रेसला कधीही माफ करणार नाही, असे ठाकूर म्हणाले.
ठाकूर यांनी या पुस्तकाच्या आडून काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, या पुस्तकात राहुल गांधींना करिश्माई नेता संबोधणे हास्यास्पद आहे. कारण त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने लोकसभेची निवडणूक लढली आणि इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसला सर्वांत कमी ४४ जागा जिंकता आल्या.
ठाकूर यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस सदस्य भडकले आणि त्यांनी ठाकूर यांच्याशी वाद घातला. यावेळी सभागृहात गदारोळ झाला, त्यामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज दुपारपर्यंत तहकूब केले.
पुस्तकातील मजकूर वगळण्याचे आश्वासन…
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी ‘शैक्षणिक हत्या’ अशा शब्दात या पुस्तकातील संदर्भाचा निषेध केला. या पुस्तकातील हा मजकूर वगळण्यात येईल, असे आश्वासन इराणी यांनी सभागृहात दिले.
भगतसिंगांना दहशतवादी संबोधण्यात आल्याचा मुद्दा लोकसभेतही उपस्थित करण्यात आला. भगतसिंग यांना ‘क्रांतिकारी दहशतवादी’ आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ‘करिश्माई नेता’ संबोधण्यात आल्यावरून लोकसभेत सत्तारूढ पक्षाचे सदस्य आणि विरोधी सदस्यांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.