रिलायन्स पाताळगंगा संघाकडून खेळणारे क्रिकटपटू विवेकानंद तांडेल यांनी आपल्या वयाच्या ५८व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांचा शेवटचा सामना ते रिलायन्स नागोठणे येथे आयोजित करण्यात आलेल्या इंटरसाईट टी-२० क्रिकेट स्पर्धेत रिलायन्स नागोठणे संघाविरुद्ध खेळले. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांनी त्यांना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. त्यांच्या शेवटच्या सामन्यातही एखाद्या उमद्या तरुण खेळाडूप्रमाणे ते गोलंदाजी करत होते.
तांडेल हे मागील सुमारे ३४ वर्षे रिलायन्स पाताळगंगा संघाकडून खेळले. यापूर्वी रायगड जिल्ह्याच्या संघातही ते खेळले होते. जिल्ह्यातल्या अनेक स्पर्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची जिल्हाभर ख्याती होती. क्रिकेटवर असणारे अतोनात प्रेम, शारीरिक फिटनेस, नवीन चेंडूचा योग्य वापर यावर ते इतकी वर्ष क्रिकेट खेळले. त्यांचा शेवटचा सामना पाहण्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, निवड समिती अध्यक्ष विजय पाटील, रिलायन्सचे राजेंद्र कोंढाळकर, भगवान शेट्टी, सुनील शिंदे, विश्वनाथ उतेकर, शाम पाटील, देवेंद्र पाटील, शेखर वाढीवकर आदी खेळाडू व रिलायन्सचे प्रमुख मान्यवर हजर होते.
त्यांच्या गौरवार्थ रिलायन्स एक सन्मान सामना घेणार असल्याचे रिलायन्सतर्फे यावेळी जाहीर करण्यात आले. या सामन्यात सर्व माजी खेळाडू सहभाग घेतील. भविष्यात आपण रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून काम करणार असून आपल्या अनुभवाचा फायदा जिल्ह्यातील तरुण खेळाडूंना करून देणार असल्याचे तांडेल यांनी सांगितले. शेवटी विवेकानंद तांडेल यांनी रिलायन्स संघ, सर्व खेळाडू आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.