कर्नाळा : चालती एसटी अचानक पेटली

मुरुडहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. कर्नाळा अभयारण्यातून जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग लागली त्यावेळी एसटी बसमध्ये ५१ प्रवासी होते. त्यात तीन लहान मुलांचाही समावेश होता.

चालकाचे प्रसंगावधान 

बसला आग लागल्याचे प्रथम बस चालकाच्या लक्षात आले. याबाबत त्यांना अधिक विचारले असता त्यांनी, ‘बसच्या इंजिनमध्ये मला पहिल्यांदा कसला तरी आवाज झाल्याचे ऐकू आले. त्यानंतर इंजिन खालून धूर निघण्यास सुरुवात झाली. त्यावेळी आग लागल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर तत्काळ बस थांबवून मी प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. त्याचवेळी आगीचे लोन बसच्या पुढच्या बाजूकडून मागच्या बाजूकडे पसरत होते. वाहकाच्या मदतीने सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढल्यानंतर काही वेळातच बस जळून खाक झाली.’ अशी माहिती दिली.

अपघाताबाबत अग्निशमन दल आणि पोलिसांना कळवण्यात आले. बस जळून खाक झाली तरी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले नव्हते. या घटनेनंतर कर्नाळामार्गावरची दोन्ही बाजूंची वाहतूक बंद पडली होती.

अपघातग्रस्त एसटी बसमधील प्रवाशांना पर्यायी बस पनवेल डेपोमधून पाठवत असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असून या घटनेची चौकशी करण्यात येईल असेही आश्वासन दिले. मात्र एसटी बसला वारंवार अशा पद्धतीने अचानक आग कशी काय लागते असा सवाल सराव्कडून विचारला जात आहे.

बस पेटण्याची दुसरी घटना 

गेल्या आठवड्यातच खोपोली येथे अशीच चलती बस पेटली होती. सुदैवाने त्यातही कोणती जीवितहानी झाली नव्हती. मात्र अशा घटना वारंवार होत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *