राज्यातील रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी स्थापन करण्याची घोषणा गुरुवारी केली. या कंपनीतर्फे येत्या चार वर्षात २३ हजार कोटी रुपये खर्च करून नऊ प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहेत. तसेच येत्या १५ मेपर्यंत मुंबईत एसी लोकल चालवण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.
महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीमार्फत कोल्हापूर-वैभववाडी, बारामती-लोणंद, पुणे-नाशिक, अहमदनगर-परळी-वैजनाथ, वर्धा-नांदेड (यवतमाळ-पुसद), मनमाड-इंदूर, गडचांदूर-आदिलाबाद, वडसा-देसाईगंज-आरमोरी-गडचिरोली-नागपूर-नागभीड आदी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर मुंबईतील नऊ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा, सीएसटी-पनवेल उन्नत रेल्वे मार्ग, सीएसटी रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण, अशा महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा गुरुवारी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात केली.
सीएसटी-पनवेल उन्नत रेल्वे मार्गाचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार केला असून त्याचे भूमिपूजन १५ ऑगस्टला करण्यात येणार आहे. चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्ग विरार ते वांद्रे आणि वांद्रे ते चर्चगेट, असा दोन टप्प्यात असेल. हार्बर मार्गावर ४ हजार कोटी रुपये खर्च करून सिग्नल यंत्रणेत बदल केले जातील.
एमयूपीटी-३च्या कामाला वेग देणे, मध्य रेल्वेच्या १० आणि पश्चिम रेल्वेच्या १० रेल्वे स्थानकांवर एस्कलेटर, सीएसटी स्थानकांचे नूतनीकरण करून तेथे छत्रपत्री शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, मुंबई ते दिल्ली दरम्यान अतिजलद टालगो ट्रेन, लोकल ट्रेन, बस, मोनो, मेट्रोसाठी सामायिक तिकीट व्यवस्था, जूनपर्यंत हार्बरवरील सर्व गाडया १२ डब्यांच्या करणार आदी घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केल्या.