मुंबई- रेल्वे स्थानकांत किंवा सिग्नलवर शेकडो बेघर, अनाथ लहान मुले राहात असतात. कामावर जाताना किंवा प्रवास करताना दररोज ही मुले आपल्या नजरेस पडतात. त्यातील ब-याच मुलांचे चेहरे आपल्या परिचयाचे होतात. ही मुले आपल्यालादेखील ओळखत असतात. या बेघर मुलांत मुलीही असतात, मात्र पुढे काही वर्षानंतर वयात येणा-या या मुली दिसेनाशा होतात. आणि आपल्याला प्रश्न पडतो की, वयात आलेल्या या बेघर मुली एकाकी जातात तरी कुठे?
मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूक सिग्नल किंवा रेल्वे डब्यांत गाणी म्हणत भीक मागणे, गजरे विकणे, फळे-वस्तू विकणा-या अनेक लहान मुली आहेत, मात्र अत्यंत दारिद्री अवस्थेत या मुली कुटुंबांसह राहत असतात. त्यातील अनेक कुटुंबे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाष्ट्रातून आलेली आहेत. चांगले आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षित जगण्यापासून या मुली वंचित असतात. या बेघर, निराधार मुलांचे अनेक प्रश्न असतात. यातील मुलींच्या समस्या तर अधिकच जटिल आहेत. एखाद्या मुलाने घर सोडले तर तो कोठेही राहू शकतो, झोपू शकतो. मुलींचे तसे नसते. अनेक वाईट नजरा अशा मुलींना हेरत असतात. बेघर मुलींचे रात्रीचे जगणे म्हणजे धोका असतो. मग ती कोणत्याही वयाची असो. काही वेळा तर त्यांच्यावर वाईट प्रसंग गुदरतात. अशा भयाण परिस्थितीत या मुली मोठय़ा होत असतात. त्यांचे स्वच्छ, सुंदर दिसणेदेखील धोक्याचे ठरते. वयात येताच या मुली सोबतीच्या मुलासोबत किंवा ज्यांच्यासोबत तिचे मैत्रीचे नाते आहे; अशा मुलासोबत लग्न करून राहू लागतात. अनेकांचे पालकच आपसात लग्न लावून मोकळे होतात. पुढे त्यांचा नवरा चांगला निघाला तर या मुली कष्ट करून मोठय़ा होतात. अशा अनेक मुली आहेत; ज्या आज चांगले जीवन जगत आहेत. फक्त त्यांच्या जोडीदाराची साथ त्यांना लाभली पाहिजे. काही मुली सरकारी किंवा संस्थांच्या निवारा केंद्रात राहतात. त्यादेखील पुढे आवडत्या मुलासोबत लग्न करून स्वत:चे कुटुंब निर्माण करतात.
काहींच्या आयुष्यात मात्र सुरुवातीपासूनच अंधारच असतो आणि तो अखेपर्यंत राहतो. ऐन वयात येणा-या या मुलींशी काही जण फसवून लग्न करतात. त्यांना गैरमार्गाला ओढतात. त्यांना कोणाचाही आधार नसल्याने या मुली मुकाटय़ाने आपले आयुष्य अशा नरकात काढत असतात. सरकारचे अनेक कायदे आणि योजना असल्या तरी त्यांची अंमलबजावणी होत नाही. बालकांच्या अधिकारांनुसार अशा बेघर मुलींची जबाबदारी सरकारची आहे, मात्र आईवडील असल्याचे कारण सांगत सरकार आपली जबाबदारी झटकते.