आंब्याला चांगला दर मिळण्यासाठी दलालांशी चर्चा

यंदाच्या वर्षी आंब्याचे उत्पादन अतिशय कमी होणार असल्याने उपलब्ध आंब्याला चांगला दर मिळावा यासाठी वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील दलालांशी अतिशय सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी येथे दिली. संस्थेचे प्रतिनिधी सर्वश्री प्रकाश साळवी, प्रसन्न पेठे, तुकाराम घवाळी इत्यादींनी या संदर्भात आज येथे माहिती देताना सांगितले की, गेली काही वष्रे लहरी हवामानामुळे आंबा उत्पादनाला सातत्याने मोठा फटका बसत आहे. त्यातच वाशीच्या दलालांकडे पाठवल्या जाणाऱ्या रत्नागिरी हापूस आंब्याला सातत्याने समान दर मिळत नाही. त्यामुळे आंबा बागायतदारांचे आणखी नुकसान होते. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात आंबा फारच कमी प्रमाणात विक्रीसाठी वाशीच्या बाजारपेठेत गेला. तरीसुद्धा आंबा पेटय़ांचे भाव सातत्याने घसरत राहिले. म्हणून त्या संदर्भात संबंधित दलालांशी व निर्यातदारांशी गेल्या आठवडय़ात सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत दलालांनी देशाच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू इत्यादी भागांतून येणाऱ्या आंब्याशी रत्नागिरीच्या हापूसची तुलना करणे योग्य होणार नाही, असे त्यांच्या सोदाहरण निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच या आंब्याच्या दर्जानुसार दरामध्ये किमान तफावत असावी अशी मागणी करण्यात आली. तेथील बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या आंब्याचे भाव येथील बागायतदारांना दररोज दुपारी कळवण्यात यावेत, अशीही सूचना या चर्चेदरम्यान करण्यात आली. या संदर्भात संबंधित दलाल व निर्यातदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून बागायतदारांच्या मागण्यांनुसार लवकरच कार्यवाही होईल, असा विश्वास आंबा बागायतदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कर्नाटकमध्ये उत्पादन होणाऱ्या आंब्यामध्ये आणि रत्नागिरी हापूस आंब्यामध्ये बाह्य़त: बरेच साम्य असते, त्यामुळे ग्राहकांची फसगत होते. ती टाळण्यासाठी रत्नागिरी हापूसला भौगोलिक सांकेतांक (जिऑग्राफिकल आयडेन्टिफिकेशन) आवश्यक असल्याचे आग्रही प्रतिपादन या पदाधिकाऱ्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *