बालिका वधू या गाजलेल्या मालिकेतील “आनंदी‘ची भूमिका करणारी अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचा मृतदेह शुक्रवारी दुपारी तिच्या घरात सापडला. तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गोरेगावमधील मोतीलालनगर येथील “हार्मनी रेसिडेंट‘च्या सातव्या मजल्यावर राहणारी प्रत्युषा काही दिवसांपासून प्रियकरासोबत असलेल्या नातेसंबंधांतील तणावामुळे निराश झाली होती. दुपारी घरात एकटीच असताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन मित्रांनी तिला कोकीलाबेन अंबानी रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारांपूर्वीच मृत घोषित केले.
हिंदी टीव्ही मालिकांमध्ये 2010 पासून काम करणारी प्रत्युषा “बालिका वधू‘मधील भूमिकेनंतर हिंदी मालिकांतील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. मूळच्या झारखंडच्या असलेल्या प्रत्युषाने यापूर्वी “झलक दिखला जा‘ या मालिकेत काम केले होते. याशिवाय, “प्यार तूने क्या किया?‘ ही मालिका, “बिग बॉस‘चा सातवा सीझन, सावधान इंडियाच्या “वुमन अगेन्स्ट क्राईम‘ या विशेष भागांतही तिने काम केले होते. “बालिका वधू‘मधील भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली होती.
काही दिवसांपासून ती मानसिक तणावाखाली होती. कर्ज वसुलीसाठी आलेल्या एका तरुणाने विनयभंग केल्याची तक्रारही तिने कांदीवली पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी केली होती. तिच्या मृत्यूमुळे हिंदी मालिका जगतात एकच खळबळ उडाली आहे.
“मर के भी मूंह न मुझसे मोडना‘
टीव्ही मालिकांत अतिशय संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रत्युषा तिच्या वैयक्तिक जीवनातही तेवढीच संवेदनशील होती. मृत्यूपूर्वी तिने तिच्या मोबाईलवरील व्हॉट्सऍप स्टेटस “मर के भी मूंह न मुझसे मोडना‘ असे ठेवले होते.