ब्रसेल्स बॉम्बस्फोट : २१४ नागरिक सुखरूप भारतात परतले

बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समधल्या विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तिथून होणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली होती. त्यामुळं अनेक भारतीय ब्रसेल्स विमानतळावर अडकून पडले होते. हे सर्व २१४ भारतीय सकाळी सुखरुप भारतात परत आलेत. तर इन्फोसिसचे कर्मचारी बेपत्ता आहेत.

अॅमस्टरडॅम- दिल्ली विमान आज सकाळी दिल्ली एअरपोर्टवर लॅण्ड झालं आणि या सर्व भारतीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी विमानतळावर आलेल्या काही नातेवाईकांनादेखील अश्रू आवरणं कठीण जात होतं. या विमानातून सुमारे २१४ भारतीय नागरिक सुखरूप भारतात परतलेत.

बेल्जिअमची राजधानी ब्रसेल्समध्ये झालेल्या बॉम्बस्फोटादरम्यान इन्फोसिसचे कर्मचारी राघवेंद्र गणेश हे भारतीय नागरिक बेपत्ता झाले आहेत. बॉम्बस्फोट झाला त्यावेळी राघवेंद्र मेट्रोमधून प्रवास करत होते. राघवेंद्र यांनी शेवटचा फोन मेट्रोमधून केला होता. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिलीय.

राघवेंद्र यांचे भाऊ ब्रसेल्सला पोहोचले असून, भारतीय दुतावासाकडून त्यांना सर्व मदत केली जातेय. दरम्यान ब्रसेस्लमध्ये अडकलेले सर्व भारतीय नागरिक भारतात परतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *