जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीनमध्ये गेल्या ३ फेब्रुवारीला हिमस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जवानांचे पार्थिव सोमवारी दिल्लीत आणण्यात आले आणि श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांच्या जन्मगावी पाठविण्यात आले.
जवानांचे मृतदेह सकाळी दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आले त्यावेळी संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजितसिंग, लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग, हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल अरूप राहा उपस्थित होते. या धाडसी जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. शहीद जवानांमध्ये सुभेदार नागेश टी. टी. यांचाही समावेश आहे. ज्युनिअर कमिशन्ड अधिकारी असलेले नागेश हे त्यांच्या साहसामुळे ‘रॅम्बो’म्हणून ओळखले जायचे. आपल्या १२ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अत्यंत अवघड क्षेत्रात काम केले.
‘आॅपरेशन पराक्रम’मध्येही ते सहभागी झाले होते. या मोहिमेत त्यांनी मोठ्या प्रमाणात भूसुरुंग शोधून काढले होते. खराब हवामानामुळे जवानांचे मृतदेह लेहमधील लष्करी छावणीत ठेवण्यात आले होते.