पहिल्यांदाच भरणाऱ्या मेक इन इंडिया सप्ताहाला मुंबईत आजपासून सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन होत आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जय्यत तयारी केली आहे.
या संपूर्ण सप्ताहात ४ लाख कोटीहून अधिक गुंतवणूक अपेक्षित असून १२ लाख रोजगार निर्मितीचे टार्गेट राज्य सरकारने ठेवले आहे. बीकेसीतल्या एमएमआरडीए ग्राऊंडवर १३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या मेक इन इंडिया सप्ताहासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. दोन लाख चौरस फूट क्षेत्रावर विविध दालने उभी केली गेली आहेत. देशातील आणि जगभरातील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने कंबर कसली आहे.
मेक इंन इंडिया सप्ताह वैशिष्ट्य :
– बीकेसीमध्ये दोन हजार चौरस फूट मैदानावर भव्य दालने
– ५०० हून अधिक प्रदर्शक ( एक्झिबिटर)
– २७ प्रदर्शन सभागृहे
– ४२ सेमीनार आणि पॅनल डिस्कशन
– महाराष्ट्र पॅव्हेलियन
– प्रात्यक्षिके आणि थीम एरिया
– कॉन्फरन्स सुविधा
– व्हिजिटर फॅसिलिटी सेंटर
– ६८ देशांमधील उद्योग शिष्टमंडळे भेट देणार
– देशातील अनेक राज्यही सहभागी होणार
या उत्पादन क्षेत्रावर भर
भारत आणि महाराष्ट्र उत्पादन क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यामुळे मेक इन इंडिया सप्ताहात प्रामुख्याने उत्पादन क्षेत्रावर भर दिला जाणार आहे. यामध्ये
– ऑटो आणि ऑटो काम्पोनन्ट
– अपारंपरिक ऊर्जा
– संरक्षण आणि एअरोस्पेस
– अन्नप्रक्रिया
– बांधकाम सामग्री
– पायाभूत सुविधा
– रसायने आणि पेट्रोकेमिकल्स
– इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
– औषधनिर्माण
– वस्त्रोद्योग
– इंडस्ट्रियल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग
याचा त्यामध्ये समावेश आहे.
मेक इन इंडिया सप्ताहाच्या माध्यमातून महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध कंपन्यांबरोबर करार करण्याची तयारी सरकारने आधीच केली आहे. महाराष्ट्र हा उद्योग आणि परदेशी गुंतवणुकीत देशात सर्वात आघाडीवर आहे. ही आघाडी आणखी बरीच वाढवण्याची संधी महाराष्ट्राला मेक इन इंडिया विकमुळे मिळणार आहे.