अर्थसंकल्पानंतर एप्रिलमध्ये वित्तीय धोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँक रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सनी कपात करण्याची शक्यता नोमुराने वर्तवली आहे.
जपानी वित्तसंस्था नोमुराच्या अहवालानुसार, एकूण मूल्याधारित विकासदर रिझर्व्ह बँकेने भाकीत केलेल्या ७.४ टक्क्य़ाच्या थोडा कमी असेल, त्यामुळे दरात कपात करण्यास योग्य स्थिती आहे.
वर्ष २०१५-१६ मध्ये खासगी क्षेत्रातून वाढलेली मागणी आणि स्थिर सार्वजनिक गुंतवणुतील वाढ यामुळे भारताच्या विकासाच्या चक्राने गती घेतली असली तरीही जीडीपी आणि प्रत्यक्ष आकडेवारी यात काहीही संबंध नाही, असेही नोमुराने म्हटले आहे.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदा अर्थव्यवस्थेचा विकास ५ वर्षातील सर्वात उच्च अशा ७.६ टक्क्य़ाने होण्याची अपेक्षा आहे.
आर्थिक वर्ष २०१७ मध्ये जीडीपीतील वाढ काहीशी गती घेऊन ७.८ टक्के होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. विकासाचे चक्र संथ परंतु स्थिरगतीने वर जाणारे असल्याचे संकेत यातून मिळत आहेत, असे नोमुराने अहवालात सांगितले आहे. परंतु खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीचे कमी होत गेलेले प्रमाण आणि ठप्प झालेली परदेशी मागणी यामुळे सुधारणेची गती संथ राहील, असेही पुढे सांगितले आहे.