हिंदू राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न

देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न सुरू असून, अल्पसंख्याक समाजाबद्दल द्वेष पसरविला जात आहे. देशाच्या एकतेसाठी हा प्रकार घातक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी भाजपाचे थेट नाव न घेता केली.

नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात पवार यांनी देशातील निवडक इतिहासकार, लेखक, विचारवंतांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीचे पडद्यामागील सूत्रधार आ. जितेंद्र आव्हाड होते. देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर या वेळी चर्चा झाली. या वेळी पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपा सरकारला निशाणा साधला. ते म्हणाले, हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी इतिहास आणि शालेय अभ्यासक्रमातील बदल देशाच्या एकतेला बाधक आहेत. येणाऱ्या भावी पिढीला मोडतोड झालेला इतिहास दिला जाऊ नये, त्यांना योग्य तो इतिहास कळावा यासाठी आता इतिहास संशोधकांनी

पुढे यायला हवे; आणि ठाम भूमिका घेत योग्य ती माहिती समोर द्यायला हवी. अन्यथा भारतीय इतिहासात भाकडकथा घुसवून इतिहासाची मोडतोड चालूच राहील. (प्रतिनिधी)शनी-शिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेशाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत पवार म्हणाले की, या घटनेला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. जो देव स्रीला प्रवेश नाकारतो तो देवच मी मानत नाही.

तो इतिहास कल्पनाविलासच!

साधनांशिवाय लिहिलेला इतिहास कल्पनाविलासच असतो. तो काळाच्या कसोटीवर टिकत नाही. तो टिकायचा असेल तर सत्य ठामपणे सांगावेच लागेल, असे मत इतिहास संशोधकांनी या वेळी व्यक्त केले. दिल्लीचे प्रो. के.एम. श्रीमाळी म्हणाले, देशाच्या संसदेत बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत सेक्युलर हा शब्दच नव्हता असे धादांत खोटे सांगितले जाते. मुळात सेक्युलर ही संकल्पना आहे व बाबासाहेबांनी ती पानोपानी मांडलेली असताना खोटे दाखले देणे सुरू झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *