ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत अरूण टिकेकर यांचे मंगळवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडली आणि सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत लोकसत्ता या दैनिकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे कल्पक संपादक म्हणून सर्वसामान्य वाचकांना अरुण टिकेकर हे नाव माहित आहे पण याव्यतिरिक्त इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले अरुण टिकेकर यांनी या ग्रंथाचे लेखन केले आहे. अरुण टिकेकर यांच्याकडे पंधरा ते वीस हजार पुस्तकांचा संग्रह होता. तरुण पत्रकार, राजकीय नेत्यांना त्यांनी नेहमीच मार्गदर्शन केले. अरुण टिकेकर चांगले मित्र, मार्गदर्शक होते. एखादी व्यक्ती त्यांना आवडली मग ती व्यक्ती छोटी असो वा मोठी त्यांनी ते संबंध वाढवले, जोपासले अशा भावना त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केल्या.
अरुण टिकेकर यांच्या निधनाबद्दल दैनिक लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी शोक व्यक्त केला. अरुण टिकेकर व्यासंगी पत्रकार होते. त्यांनी जगभर प्रवास केला होता. कुठल्याही विषयावर ते लिहायचे. वाचनातूनच नव्हे तर, अनुभवातून त्यांनी लेखन केले. एखाद्या विषयाचा बारीक विचार करुन ते लिहायचे. हातच राखून त्यांनी कधी लेखन केलं नाही. जे योग्य वाटलं, पटलं ते लिहील अशा भावना दैनिक लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी व्यक्त केल्या.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनीही अरुण टिकेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. आजच्या पत्रकारीतेत ज्या गुणांची वानवा आहे किंवा आवश्यकता आहे. त्या सर्व गुणांनी अरुण टिकेकर संपन्न होते. ते नेहमीच प्रसिध्दीपासून दूर राहिले असे राजीव खांडेकर यांनी सांगितले.