नवी दिल्ली – सम-विषम योजनेच्या यशस्वीतेबद्दल दिल्लीच्या नागरिकांचे आभार मानण्यासाठी आम आदमी पक्षाने (आप) आज आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान एका महिलेने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिशेने शाई फेकली. केंद्रातील भाजप सरकार आणि दिल्ली पोलिसांचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप “आप‘ने केला आहे.
छत्रसाल स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात केजरीवाल उपस्थित नागरिकांसमोर आभार व्यक्त करत असताना एक महिला चपळाईने व्यासपीठाकडे धावली आणि भाषण करण्यासाठी उभे असलेल्या केजरीवाल यांच्या दिशेने शाई फेकली. त्यातील काही थेंब मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर उडाले. एका गैरव्यवहाराचा मोठ्याने उल्लेख करत या महिलेने काही कागदपत्रेही व्यासपीठावर फेकली.
सुरक्षारक्षकांनी तातडीने मुख्यमंत्र्यांभोवती कडे उभारले, तर त्यातील काही जण त्या महिलेला अडविण्यासाठी धावले. तिला जाऊ द्या, सोडा तिला. दिल्लीत काहीतरी चांगले घडत असताना हे काय घडत आहे, असे म्हणत केजरीवाल यांनी सुरक्षारक्षकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दिल्ली पोलिस त्या महिलेला तेथून बाजूला घेऊन गेले. केजरीवाल यांनी आपले भाषण थोडक्यात संपविले आणि कार्यक्रम संपला.
त्याठिकाणी माध्यमांशी बोलताना या महिलेने आपण आम आदमी सेनाशी संबंधित असल्याचा दावा केला. आम आदमी पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या लोकांनी आम आदमी सेना स्थापन केली आहे. तिने आपले नाव भावना असल्याचे आणि आम आदमी सेनेच्या पंजाब शाखेत काम करत असल्याचे सांगितले. भावनाला उत्तर दिल्लीतील मॉडेल टाऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
“आप‘ने हा मुख्यमंत्र्यांविरुद्ध कट असल्याचे म्हणत सुरक्षा व्यवस्थेच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर दिल्ली पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सुरक्षा व्यवस्थेसंबंधी उपायुक्तांना अहवाल देण्यास सांगितले आहे.
दिल्ली पोलिस काय करत होते? केजरीवाल यांच्या दिशेने शाई फेकली जात असताना त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांविरुद्ध शाईफेक हा भाजप आणि दिल्ली पोलिसांचा कट आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली.

शाई फेकणाऱ्या महिलेचे म्हणणे…
सम-विषम योजनेच्या नावाखाली दिल्ली सरकारने सीएनजी गैरव्यवहार केला आहे. उत्तर प्रदेशमधील इतर दुचाक्यांच्या क्रमांकांवर सीएनजीचे सिलिंडर दिले गेले आहेत. यासंदर्भातील पुरावे माझ्याकडे आहेत. मी मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागितली होती. मात्र, त्यांनी ती दिली नाही, असे केजरीवाल यांच्यावर शाई फेकणाऱ्या भावना नावाच्या महिलेने सांगितले.

शाई फेकणाऱ्या महिलेचे म्हणणे…
सम-विषम योजनेच्या नावाखाली दिल्ली सरकारने सीएनजी गैरव्यवहार केला आहे. उत्तर प्रदेशमधील इतर दुचाक्यांच्या क्रमांकांवर सीएनजीचे सिलिंडर दिले गेले आहेत. यासंदर्भातील पुरावे माझ्याकडे आहेत. मी मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागितली होती. मात्र, त्यांनी ती दिली नाही, असे केजरीवाल यांच्यावर शाई फेकणाऱ्या भावना नावाच्या महिलेने सांगितले.