मुंबई महापालिकेत गेली २२ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता उलथवून टाकून काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले. मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणे हीच मुरली देवरा यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले.
मुंबई काँग्रेसचे कार्यालय असलेल्या ‘राजीव गांधी भवन’ येथील एका सभागृहाला माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे नाव देण्यात आले. त्याचे अनावरण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना नारायण राणे पुढे म्हणाले की, मुरली देवरा यांनी काँग्रेस पक्षासाठी जे काम केले त्याचा गौरव म्हणून त्यांचे नाव सभागृहाला देण्यात आले. मुरली देवरा हे सर्वाना बरोबर घेऊन काम करणारे नेते होते. ते काँग्रेसचे नेते असले तरी इतर पक्षातील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते.
आपण आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने एकमेकांना ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणतो. मुरली देवरा मात्र बारा महिने गोडच बोलत होते. म्हणूनच काँग्रेस अल्पमतात असतानाही ते मुंबई महापालिकेचे महापौर झाले होते. इतर पक्षात असलेल्या त्यांच्या मैत्रीचा फायदा तेव्हा काँग्रेसला झाला होता. ते सलग २२ वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या कामामुळे मुंबईत काँग्रेसचे नगरसेवक, आमदार, खासदार निवडून येत होते, असेही राणे म्हणाले.
मुंबईमध्ये पुन्हा काँग्रेसला मजबूत करण्यासाठी मुरली देवरा यांचे नाव घेऊन सर्वानी एकदिलाने करावे, असे आवाहन करून राणे म्हणाले की, मुंबईत २२ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता उलथू टाकून काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी आता काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने कामाला लागावे. आज आपण काँग्रेसचा जयजयकार करीत आहोत. राहूल गांधी, सोनिया गांधी यांचा जयजयकार करीत आहोत. परंतु मुंबई महापालिकेत जेव्हा सत्ता येईल तेव्हाच या जयजयकाराला खरा अर्थ येईल. म्हणूनच काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिका जिंण्यासाठी सज्ज व्हावे, तीच मुरली देवरा यांना श्रद्धांजली असेल, असेही राणे म्हणाले.