दुसरे महायुद्ध, १९६५ मधील भारत-पाकिस्तान युद्ध, १९७१मध्ये बांगलादेशाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणा-या लेफ्टनंट जनरल जेएफआर जेकब (९२) यांचे बुधवारी निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
कोलकाता येथील एका बगदादी ज्यू कुटुंबात १९२३ रोजी जन्मलेल्या जेकब यांचे शालेय शिक्षण दार्जिलिंगमधील शाळेत झाले. त्यांचे पूर्ण नाव जेकब फर्ज राफेल जेकब. १९व्या वर्षी त्यांनी सैन्य दलात प्रवेश केला.
भारतीय लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख म्हणूनही काही काळ जेकब यांनी काम पाहिले. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पंजाब व गोवा राज्याचे राज्यपाल पद भूषवले होते. तत्कालीन पूर्व पाकिस्तानचे जनरल नियाझी यांच्याशी चर्चा करून पाकिस्तानी सैन्याच्या शरणागतीची प्रक्रिया ठरवण्यात जेकब यांचा महत्त्वाचा वाटा होता.
जेकब दुसरे महायुद्ध, १९६५मध्ये झालेले भारत-पाकिस्तान युद्ध आणि १९७१ मधील बांगलादेश निर्मितीचे मुख्य साक्षीदार होते. लष्करातील निवृत्तीनंतर जेकब यांनी १९७१च्या युद्धातील आठवणींना उजाळा देणारी दोन पुस्तकेही लिहिली.