पठाणकोट हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असतानाच गुप्तचर यंत्रणांनी खळबळजनक माहिती उघडकीस आणली आहे. अवघ्या वीस रुपयांची लाच देऊन या महत्त्वपूर्ण हवाईतळावर स्थानिकांना गुरे चरण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. तसेच लष्कराच्या उपाहारगृहात स्थानिक नागरिक राजरोस खरेदी करत असल्याचे उघड झाले.
पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएनने सुरू केल्यानंतरगुप्तचर यंत्रणेने ही विविध माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या महत्त्वपूर्ण व अतिसंवेदनशील हवाईतळावर शेजारील गावातील अनेक नागरिक गुरे चरवण्यास येत असतात. यासाठी या तळावरील सुरक्षारक्षकांना वीस रुपयांची लाच दिली जात असल्याचे उघड झाले. या हवाईतळाच्या बाजूला गुज्जर समाजाची लोकसंख्या आहे. हे लोक गुरे चरण्यासाठी बिनधास्तपणे या तळाचा वापर करतात. या हल्ल्यानंतर पंजाब सरकारने गुज्जर समाजाची लोकसंख्या मोजण्यास सुरुवात केली आहे.
हवाईतळावर अनेक दुकाने असून लष्कराचे विशेष कॅँटीन आहे. यात स्थानिक लोक खरेदीसाठी येत असल्याचे आढळले आहे. यासाठी लागणारे ओळखपत्रही सुरक्षारक्षक बनवून देतात असे आढळले आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटी गुप्तचर यंत्रणेने केंद्रीय गृहखात्याला केल्या आहेत.
पठाणकोट हल्ल्याची चौकशी करताना एनआयएने मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील सांबा आणि कथुआ भागाला भेट दिली. मागील वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्ला झाला होता. त्याची चौकशी करतानाच पोलिसांनी पठाणकोट हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी ज्या पोलीस अधीक्षकाचे अपहरण केले त्याचीही चौकशी केली.
२१ मार्च रोजी दोन दहशतवाद्यांनी जम्मू-पठाणकोट महामार्गाजवळ तळ ठोकून असलेल्या सुरक्षारक्षक दलाच्या तळावर हल्ला चढवला. यात दोन दहशतवादी ठार झाले होते. याबरोबरच सुरक्षारक्षक दलाचे २ जवान आणि एका मेजरचा मृत्यू झाला होता, अशी माहिती हल्ल्यांची चौकशी केल्यानंतर एनआयएने उघडकीस आणली.
एनआयएन सांबा व कथुआ तळावर चौकशी करण्यासाठी पोहोचली होती. जम्मू काश्मीरच्या कथुआ भागातील चौकशी करताना उघडकीस आले की, मागील वर्षी कथुआजवळील राजबाग परिसरात दहशतवादी आणि सुरक्षारक्षक जवानांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीमध्ये सुरक्षारक्षक दलांचे तीन जवान ठार झाले.
पठाणकोट आणि जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात साम्य आहे. २१ मार्चला दहशतवाद्यांनी सांबा या सुरक्षारक्षक दलांच्या तळांवर हल्ला चढवला होता. त्याच प्रकारे दहशतवाद्यांनी १ जानेवारीला हल्ला चढवला होता. जम्मू-काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यात पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याप्रमाणेच २ जानेवारीला पठाणकोटमधील हवाईतळावरही हल्ला घडवला गेला, अशी माहिती एनआयएने तपासाअंती सादर केली.
पठाणकोट तळाजवळ नोंदल्या गेलेल्या दूरध्वनी कॉल रेकॉर्ड्सची माहिती देण्याचे आदेश एनआयएने दिली आहे. हे दोन दहशतवादी आम्ही सुरक्षा दलाचे अधिकारी आहोत असे सांगून हवाईतळावर शिरले होते. १ जानेवारीला सकाळी त्यांनी पठाणकोट विमानतळावर प्रवेश केला होता, असे तपासात आढळले आहे.