काव्यगगनातील शुक्रतारा

काव्यगगनातील शुक्रतारा

‘आमच्या घरात सकाळी डोळे उघडल्यापासून ते मिटेपर्यंत समुद्राच्या लाटांचा आवाज पोहोचत असे. माझ्या कानात त्याच्या आठवणी आजही घुमताहेत.. वेंगुल्र्याच्या समुद्रावर माझ्या इवल्या इवल्या पावलांनी भटकायला मला अतिशय आवडे. सहसा कोणी माझ्या वाटेला येत नसे. मी आणि समुद्रदर्शनाचा आनंद! तो आनंद, ती लाटांची गाज, समुद्रावरची ती रुपेरी वाळू, तो लाटांचा आवाज आज वयाच्या ८६ व्या वर्षीही माझ्या कानात घुमत आहे. या समुद्राने आपल्या लाटांच्या गाजेने माझ्या वयाच्या ५ व्या वर्षापासून मला सोबत केली..’

।। शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातूनी।।
।। चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनी।।
।। आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा।।
।। तू अशी जवळी रहा।।

भौगोलिकदृष्टया जरी शुक्र हा ग्रह असला तरी भावगीतात त्याला ता-याची उपमा देणारे थोर कवी म्हणजे मंगेश पाडगावकर. या गीताला कै. श्रीनिवास खळे यांनी संगीताचा साज चढवला तर अरुण दाते व सुधा मल्होत्रा यांनी साज चढवला तो स्वरांचा! त्यांची सर्व गीते आजही अबाल वृद्धांना आनंद देतात.

१० मार्च १९२९ रोजी कोकणातील वेंगुर्ले येथे या सिंधुरत्नाचा जन्म झाला. त्यांच्या आईचे आजोबा दाजीसाहेब दाभोळकर हे तेथील पोलीस पाटील म्हणून प्रसिद्ध असून ते दाजी फौजदार या नावाने ओळखले जात असत.

वेंगुर्ला उभादांडा येथे समुद्र किना-यावर त्यांचे घर होते. (आज ते घर अस्तित्वात नाही)  पाडगावकरांचे आजोबा बनुभाऊ कुलकर्णी हे लेखक होते.

बालपणीच्या आठवणीबद्दल पाडगावकर यांना विचारले असता ते थेट आपल्या भुतकाळात रमले. ते म्हणाले, ‘आमच्या घरात सकाळी डोळे उघडल्यापासून ते मिटेपर्यंत समुद्राच्या लाटांचा आवाज पोहोचत असे. माझ्या कानात त्याच्या आठवणी आजही घुमताहेत..

वेंगुल्र्याच्या समुद्रावर माझ्या इवल्या इवल्या पावलांनी भटकायला मला अतिशय आवडे. सहसा कोणी माझ्या वाटेला येत नसे. मी आणि समुद्रदर्शनाचा आनंद! तो आनंद ती लाटांची गाज, समुद्रावरची ती रुपेरी वाळू, तो लाटांचा आवाज आज वयाच्या ८६व्या वर्षीही माझ्या कानात घुमत आहे. या समुद्राने आपल्या लाटांच्या गाजेने माझ्या वयाच्या पाचव्या वर्षापासून मला सोबत केली.’

पाडगावकरांचे वडील केशव आत्माराम पाडगावकर हे व्यवसायाने अभियंता होते. तर मातोश्री रखमाबाई ऊर्फ इंदिरा या सुसंस्कृत गृहिणी. त्यांना वाचनाची अतोनात आवड असून त्या कविता करायच्या. आपल्या आईकडून हा वारसा त्यांनी घेतला. पाडगावकरांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला उभादांडा येथील शाळा नं-३ येथे झाले.

याबद्दल ते म्हणाले, ‘‘माझी आई मला शाळेत नेऊन बसवत असे, त्यामुळे तिच्या डोक्याला त्रास कमी व्हायचा. आणखी कोणाच्या डोक्याचा ताप वाढत असेल याची कल्पना नाही, पण आईची खात्री होती. कारण बालपणी मी फार नसत्या उठाठेवी करीत असे.’’

भुतकाळात रमल्यावर कविवर्य पणजोबांबद्दलही   एक मजेदार आठवण ते सांगतात. ‘‘दाजी फौजदार हे माझे पणजोबा, पण मी त्यांना दाजी आजोबा म्हणायचो, पण हे फौजदार अंधाराला भीत असत. त्यांची बसण्याची जागा म्हणजे एका रिकाम्या खोलीचा उंबरठा. त्या उंबरठयावर राजाने एखाद्या सिंहासनावर बसावे तसे तपकीर ओढत बसायचे. तपकीर त्यांना जीव की प्राण.

एरवी ते सहसा बाहेर पडत नसत, पण तपकीर संपली की, दुस-या कुणालाही तपकीर आणायला न सांगता ते म्हातारबुवा तुरुतुरु चालत बाजारात जाऊन आणत असत. ती आणलेली तपकीर उंबरठयाच्या सिंहासनावर राजाप्रमाणे बसून ते पुन्हा ओढू लागले की त्यांच्या चेह-यावर जो आनंद दिसे त्याला तोड नव्हती.’’

पाडगावकरांचे वेंगुल्र्यातील वास्तव्य १० वर्षे होते. १९३९ साली ते मुंबईत गिरगाव येथील हाजी कासीम वाडीतील इमारतीत राहावयास आले. तेथील विल्सन हायस्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. ‘‘विल्सन हायस्कूल’मध्ये वा. ल. कुलकर्णी यांच्यासारखे मराठीचे शिक्षक मला लाभले, त्यामुळे माझा मराठीचा पाया भक्कम झाला, असे कविवर्य सांगतात.

१९४३ साली वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी पहिली कविता केली. या मागील आठवण त्यांनी सांगितली. ते राहात असलेल्या हाजी कासीम वाडीसमोरील इमारतीत सुप्रसिद्ध साहित्यिक मामा वरेरकर यांचे वास्तव्य होते. त्यांच्या भेटीला त्या काळी अनेक नामवंत कवी, लेखक, साहित्यिक येत असत.

असेच एकदा कवी बा. भ. बोरकर वरेरकरांकडे आले, असता पाडगावकर यांचे आत्तेभाऊ पुरुषोत्तम मंगेश लाड यांनी बोरकरांना घरी बोलावले. त्याप्रमाणे बोरकर पाडगावकरांच्या घरी आले व एखादी कविता म्हणण्यास सांगितली, बोरकरांनी कविता म्हटली.

।। तव चिंतनी मन गुंगुनी
मी हिंडतो रानीवनी।।

या कवितेने पाडगावकर भारावले व बोरकरांची ही ओळ त्यांच्या हृदयात एवढी भिनली की बोरकरांच्या अनुनासिकांची कृपा असलेल्या स्वरात ती ओळ पाडगावकर दिवसरात्र गुणगुणायचे. एक दिवस ते बाहेरून घरी येताना, जिना चढत असताना एक सुंदर त्यांच्या वयाची तरुण मुलगी जिन्यात उभी होती.

पाडगावकरांच्या डोक्यात बोरकरांची ती कविता घोळत होतीच. त्या तरुणीला पाहून बोरकरांच्या कवितेवर त्यांना शब्द सुचले व त्यांच्या पहिल्या कवितेचा जन्म झाला.

।। तुज पाहिले तुज वाहिले नवपुष्प हे हृदयातले।।

ही ओळ घरी आल्यावर त्यांनी आईला म्हणून दाखवली व त्यावर आई म्हणाली ‘‘जणू रवींद्रनाथ टागोरच उभे आहेत की काय? असे मला वाटले.’’

१९४७ साली पाडगावकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व दादर येथील किर्ती महाविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण सुरू झाले. बी.ए.ला. ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना तर्खडकर सुवर्णपदक मिळाले. व एम.ए.ला मराठी व संस्कृत या विषयातही उत्तम यश संपादन केल्यामुळे चिपळुणकर पदक मिळाले.

११ जून १९५० रोजी रेव्हं. भास्कर कृष्ण उजगरे ऊर्फ कवी मनोहर बंधू यांची कन्या यशोदा यांच्याबरोबर त्यांचा प्रेमविवाह झाला. यशोदा या त्यांच्याच वर्गात शिकत होत्या. विवाहानंतर त्यांनी काहीकाळ मिठीबाई व सोमय्या महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याच सुमारास त्यांनी कवी वसंत बापट व विंदा करंदीकर यांच्यासमवेत कविता वाचनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली.

‘धारानृत्य’ हा पाडगावकरांचा पहिला कविता संग्रह यानंतर त्यांचे जिप्सी, निंबोणीच्या झाडामागे, छोरी, शर्मिष्ठा, उत्सव, वात्रटिका भोलानाथ, मीरा, विदुषक, बबलगम, सलाम, गझल, भटकेपक्षी, तुझे गीत गाण्यासाठी, बोलगाणी, चांदोमामा, सुट्टी एक्के सुट्टी, वेडं कोकरू, आता खेळा नाचा, झुले बाई झुला, नवा दिवस, उदासबोध, त्रिवेणी, कबीर, मोरू, सुरदास, कविता माणसांच्या माणसांसाठी, राधा, वाढदिवसाची भेट, अफाटराव, फुलपाखरू नीळ नीळ, सूर आनंदघन, मुखवटे, काव्यदर्शन, तृणपर्णे, गिरणी, आनंदऋतू, क्षणिका, अखेरची वही अशा एकूण ४० कविता प्रसिद्ध झाल्या.

तसेच विल्यम शेक्सपिअरच्या, द टेमप्लेट्स, ज्युलिअस सिझर, रोमीओ आणि ज्युलिएट या नाटकांचे त्यांनी मराठी अनुवाद केले आहेत. त्यांची कविता बहुतेक सर्व आधुनिक कवींप्रमाणे स्वच्छंदवादी आहे. त्यात समाजभिमुखतेची एक धारा मिसळलेली आहे.

त्यांची गणना जरी प्रमुख नवकवीत होत असली तरी, नवकवितेत आढळणारी कटुता, वैफल्य, रचनेचे तेढेपण इ. पासून त्यांची कविता अलिप्त आहे. त्यांच्या रम्यत्वाने वेडावून जाणा-या वृत्तीला सौंदर्याचा प्रथम आणि र्सवकष प्रत्यय येतो तो निसर्गातून. त्यांची

।। तिन्ही लोक आनंदाने भरून जाऊ दे।।
।। तुझे गीत गाण्यासाठी सुर लावू दे।।

ही कविता म्हणजे जणू निसर्गाचं लँडस्केपच आहे. निसर्गाची लसलसती गूढरम्य विलसीते त्यांच्या सौंदर्यवृत्ती बरोबरच अध्यात्म वृत्तीचेही संतर्पण करतात.

त्यांना अंतर्मुख करतात, त्यांच्या सर्जनशिलतेला आवाहन करतात. निसर्गाच्या जोडीनं त्यांच्या कवितेत प्रेमभावनेच्या अनेक गहि-या छटा आविष्कृत झाल्या आहेत. त्या दृष्टीने त्यांचे ‘शर्मिष्ठा’ हे नाटय़काव्य महत्त्वाचे आहे.

त्यांच्या ‘बोलगाणी’ काव्यसंग्रहात अनेक दर्जेदार व मजेदार कविता आहेत. वेंगुल्र्यासारख्या निसर्गरम्य परिसरांत त्यांचे बालपण गेल्यामुळे ‘वेंगुर्ल्याचा पाऊस’ ही अतिशय सुंदर कविता त्यांना सुचली.

।। वेंगुर्ल्याचा पाऊस कसा।।
।। माया करीत यायचा।।
।। सरींनी लाड करीत।।
।। मला कुशीत घ्यायचा।।
।। बाळपण माझं सगळं।।
।। भिजवलं त्याने।।
।। आईसारखं मला थोपटून।।
।। निजवलं त्याने।।
।। मला जाग येईल म्हणून।।
।। हळूच निघून जायचा।।
।। सरींनी लाड करत।।
।। मला कुशीत घ्यायचा।।

ही कविता आजही त्यांच्याकडून ऐकताना आपणास पावसात चिंब भिजल्याचा प्रत्यय येतो. त्यांच्या काही कविता उपहास उपरोधाने भरलेल्या दिसतात. ‘सलाम’ हा काव्यसंग्रह त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे.

त्यांच्या ‘जिप्सी’ काव्यसंग्रहाला त्यांचेच शाळेतील शिक्षक व सुप्रसिद्ध साहित्यिक वा. ल. कुलकर्णी यांची प्रस्तावना आहे. हा काव्यसंग्रह त्यांनी बोरकरांना अर्पण केला आहे.

पाडगावकरांना जीवनाची प्रचंड ओढ आहे. ही ओढ त्यांच्या कवितेतून ठिकठिकाणी व्यक्त झाली आहे. भावनेच्या एका प्रकारच्या जोशांत ते जीवनाची गाणी गातात. आपल्याबरोबर वाचकांच्या मनालाही ओढून नेण्याची शक्ती त्यांच्या उक्तीत आहे. या जीवनाच्या अखंड कुतूहलामुळेच, अखंड ओढीमुळे आपण एक आनंदयात्री आहोत, असे त्यांना वाटते.

।। अफाट आकाश।।
।। हिरवी धरती।।
।। पुनवेची रात।।
।। सागर भरती।।
।। पाचुंची लकेर।।
।। कुरणाच्या ओठी।।
।। प्रकाशाचा गर्भ।।
।। जलवंती पोटी।।
।। अखंड नूतन मला ही धरीत्री।।
।। आनंदयात्री मी आनंदयात्री।।

असा आत्मसाक्षात्कार त्यांच्या मनाला होतो व आपणास ओढ लावणा-या या जीवनातील विविध सौंदर्याची ते बेहोश होऊन गाणी लिहितात. त्यांना एकदा मी विचारले, ‘‘पाडगावकर, तुमच्या काव्याचं वैशिष्टय़ काय? त्यावर त्यांनी विनोदाने उत्तर दिले. ‘‘पाडगावकरांच्या काव्याला दाढी असते.’’अशा या प्रतिभा संपन्न कविवर्याना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

त्यांच्या शब्दांत सांगायचे तर,

।। या जन्मावर या जगण्यावर।।
।। शतदा प्रेम करावे!।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *