सचिन, सौरव, लक्ष्मण ‘सल्लागार’

सचिन, सौरव, लक्ष्मण ‘सल्लागार’

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, टीम इंडियाला ‘दादागिरी’ शिकवणारा सौरव गांगुली आणि संयमाचा महामेरू व्हीव्हीएस लक्ष्मण हे त्रिकूट आता टीम इंडियातील तरुण-तडफदार शिलेदारांना मोलाचे सल्ले देणार आहे. बीसीसीआयनं नव्याने तयार केलेल्या सल्लागार समितीत आज या तीन दिग्गजांची निवड करण्यात आली. या समितीत ‘द वॉल’ राहुल द्रविडचा समावेश नसल्यानं त्याच्याकडे संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली जाणार का, याबद्दल क्रिकेटवर्तुळात उत्सुकता आहे.

बीसीसीआय आणि क्रिकेटपटूंमध्ये समन्वय असावा, टीम इंडियाच्या शिलेदारांना मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी माजी क्रिकेटवीर उपलब्ध व्हावेत, परदेश दौऱ्यांची रणनीती आखताना त्यातली माहीर व्यक्ती त्यांच्यासोबत असावी, प्रशिक्षक निवडीसारख्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी एक ‘पॅनल’ असावं, असं बीसीसीआयचे ‘बिग बॉस’ जगमोहन दालमिया यांना सुरुवातीपासूनच वाटत होतं. त्यानुसार, सचिव अनुराग ठाकूर यांनी बोलाचाली सुरू केल्या होत्या. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांची नावं सल्लागार समितीसाठी चर्चेत होती. परंतु, सचिन, सौरव आणि लक्ष्मण यांच्या नावावर बीसीसीआयनं शिक्कामोर्तब केलं आणि त्यांनीही या जबाबदारीसाठी होकार दिल्याचं आज ठाकूर यांनी ट्विटरवरून जाहीर केलं.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सौरव गांगुलीच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दालमियांशी ‘दादा’चं खास सख्य असल्यानं या पदावर त्याची वर्णी लागेल, असं जाणकारांना वाटत होतं. प्रशिक्षक नाही, तर टीम डायरेक्टर म्हणून त्याच्या नियुक्तीचीही शक्यता होती. मात्र, सल्लागार समितीतील गांगुलीच्या निवडीमुळे या चर्चांना जवळपास पूर्णविरामच मिळाला आहे. ‘दादा’सोबतच, राहुल द्रविडचं नावही प्रशिक्षकपदासाठी चर्चेत आलं होतं. त्याच्याबाबत बीसीसीआयनं कुठलीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्याच्या गळ्यात संघाच्या प्रशिक्षकपदाची किंवा हंगामी प्रशिक्षकपदाची माळ पडते की काय, अशी कुजबूज ऐकू येतेय. हा सस्पेन्स ६ जून रोजी प्रशिक्षकाची घोषणा झाल्यावरच संपेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *