मुंबईच्या रेल्वेमध्ये आता मेट्रोसारखी आसनव्यवस्था केली जाण्याची शक्यता आहे. येत्या दोन महिन्यात म्हणजे फेब्रुवारीपर्यंत याबद्दलचा निर्णय घेण्याबाबत माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
नोव्हेंबर महिन्यात डोंबिवलीच्या भावेश नखातेचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर लोकलमधून पडून आणखी तीन ते चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे रेल्वे प्रशासनासमोर अपघात रोखण्याचं मोठं आव्हान आहे. यावर त्वरित आणि लवकर करता येण्याजोगा उपाय रेल्वे प्रशासनानं शोधून काढला, तो म्हणजे आसनव्यवस्थेत बदल करण्याचा.
मुंबई मेट्रोप्रमाणे मध्ये रेल्वेच्या गाड्यांमध्ये आसनव्यवस्था केली तर गर्दीचा ताण कमी होऊ शकतो आणि अपघात काही प्रमाणात रोखले जाऊ शकतात असं रेल्वे प्रशासनाला वाटतं आहे. त्यामुळे आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन लवकरात लवकर आसनव्यवस्थेचा उपाय अवलंबून पाहू अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
त्यामुळे नवा उपाय कितपत पचनी पडतो आणि त्यामुळे अपघात खरंच रोखले जाऊ शकतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.