लग्नाचा खर्च दुष्काळग्रस्तांसाठी

लग्न म्हटले की मानपानाकरिता कोट्यवधी रुपये खर्च करण्याची आणि श्रीमंतीचे दर्शन घडविण्याची अनेकांना हौस असते; परंतु पुण्यातील एका सधन जोडप्याने साधेपणाने लग्न करून लग्नासाठीचा खर्च दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता दिला आहे.

या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला त्यातून कलाटणी मिळणार आहे. त्या जोडप्याचे नाव आहे करण तावरे आणि उमा देसाई. तावरे हे एका कंपनीचे व्यवस्थापक आहेत, तर देसाई यांची स्वतःची कंपनी आहे. दोघांचेही शिक्षण परदेशात झाले असून, प्रत्येकाला शिक्षण मिळावे, या तळमळीपोटी दोघांनीही लग्नासाठीचा खर्च शिक्षणासाठी देण्याचे ठरविले.

दोघे एक डिसेंबरला विवाहबद्ध झाले. दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्याच्या शिरूरकासार तालुक्‍यातील शंभर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्वही त्यांनी स्वीकारले. यासाठीचा धनादेश त्यांनी निरंजन सेवाभावी संस्थेला सुपूर्त केला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे उपसचिव डॉ. नितीन करीर आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *